Abhishek Ghosalkar Case : ठाकरे गटातील वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांचा खून: उदय सामंत | पुढारी

Abhishek Ghosalkar Case : ठाकरे गटातील वैमनस्यातून अभिषेक घोसाळकरांचा खून: उदय सामंत

ठाणे : पुढारी वृत्तसेवा : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची हत्या ही गंभीर आणि दुर्दैवी घटना आहे. मात्र, घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा प्रकार जो विरोधक करत आहेत, तो अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा मी निषेध करतो. कारण ठाकरे गटातील अंतर्गत गँगवॉरमुळे मॉरिस नोरान्हो याने घोसाळकरांची हत्या केली आहे. या दोघांमध्ये मी नगरसेवक होणार की तू नगरसेवक होणार, हा वाद होता. यामधून हा प्रकार घडल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केला.
ठाणे येथे ते पत्रकार परिषदेत बोलत होते. Abhishek Ghosalkar Case

घोसाळकरांची हत्या करणारा मॉरिस नोरान्हो याने चार दिवसांपूर्वीच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकार हे माफियागिरी आणि गुंडगिरीला पाठबळ देत असल्याचा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. या आरोपाचे खंडन करून मंत्री सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. Abhishek Ghosalkar Case

सामंत पुढे म्हणाले की, अभिषेक घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिस नोरान्होचे उदात्तीकरण ठाकरे गटाकडून होत होते. राज्यात कुठलीही घटना घडली की, त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि गृहमंत्र्यांना यांना जबाबदार धरणे चूकीचे आहे. आरोप- प्रत्यारोप होतात, हे मी समजू शकतो, त्यातून होणारी टीका देखील मी समजू शकतो. पण आपले पाप दुसऱ्याच्या माथी मारायचे व त्यांना बदनाम करायचे, ही जी विरोधकांची प्रवृत्ती आहे, त्याला छेद देण्याची गरज आहे.

सामंत पुढे म्हणाले की, मी कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतो, मी कुणाला आदर्श मानतो आणि मी कुणाला आदर्श मानून भविष्यात काम करणार आहे, अशी ट्विट्स मॉरिसने सोशल मीडियावर टाकलेली आहेत. म्हणून अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला विनाकारण लक्ष्य करण्याऐवजी मॉरिस आणि अभिषेक घोसाळकर यांना समझोता करायला लावणारी व्यक्ती कोण?, याचा शोध घेतला पाहिजे.

या दोघांना फेसबुक लाईव्ह करायला सांगून तुमच्यातील वाद मिटवा, असे कोणी सांगितले होते? घोसाळकर आणि नोरान्हो यांच्यात समझोता झाला होता. मात्र, हे दोघे आमचे कार्यकर्ते नव्हते. या दोघांनी ठाकरे गटामध्ये एकत्र काम करुन पक्ष वाढवण्याचा निर्णय घेतला होता. ही गोष्ट पोलिसांनी तपास करताना लक्षात घेतली पाहिजे. फेसबुक लाईव्हपूर्वी या दोघांची कुणाशी चर्चा झाली होती, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही सामंत यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button