ठाणे : कळव्यातील सहकार विद्यालय या खासगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी (दि.1) दुपारी घडला आहे. दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर या सर्व मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय कधीक्षक डॉ. अनिरुध्द मळगावकर यांनी दिली आहे.
शासनाकडून सर्व सरकारी आणि खासगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो. या शालेय पोषण आहारात मुखत्वे करून खिचडी दिली जाते. कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता. मात्र मटकीला वास येतं असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या. ही आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्याचा त्रास सुरु झाला. त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवहिका पाठवून 38 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरु करण्यात आले.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांना भेटू न दिल्याने पालक संतप्त झाले होते.वॉर्डच्या बाहेरच सर्व पालकांना थांबवण्यात आल्याने पालक वॉर्ड मध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे सुरक्षारक्षक आणि पालकांमध्ये खटके उडाले.