कंधार : तालुक्यातील नेहरुनगर येथील माध्यमिक आश्रमशाळेच्या १३ विद्यार्थ्यांना मंगळवारी (दि.६) दुपारी विषबाधा झाली. विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यातील तिघांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने पुढील उपचारासाठी विष्णुपुरी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
तालुक्यातील नेहरुनगर येथे माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे एकूण ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांनी मंगळवारी दुपारी जेवण केले. तसेच पाण्याच्या टाकीतील पाणी पिले. काही वेळानंतर काही विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी, डोकेदुखी, श्वसनाचा त्रास, छातीत दुखणे, पोटदुखी असा त्रास जाणवू लागला. त्यामुळे शाळा प्रशासनाने तातडीने या विद्यार्थ्यांना कंधार ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतू तीन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी डॉ.शंकरराव चव्हाण वैद्यकीय शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
भूमिका राजू राठोड (वय ११, नेहरुनगर), किरणसिंह रावत (वय ११, नेहरुनगर), लता सुरेश चव्हाण (वय १३, नेहरुनगर), स्वप्निली बालाजी मोरे (वय ११, नेहरुनगर), गणेश बालाजी राठोड (वय११, नेहरुनगर), धनश्री नागोराव मोटरगे (वय११,नेहरुनगर), प्रतिक्षा राहुल पवार(वय ८, नेहरुनगर) गिता सुरेश चव्हाण(वय ८,नेहरुनगर), कोमल संग्राम पवार( वय १०, घणातांडा), दिदुबाई संग्राम पवार( वय १३, घणातांडा), आदित्य संग्राम पवार(वय ८, नेहरुनगर), अविनाश अशोक पवार(वय ८, नेहरुनगर) असे १२ विद्यार्थ्यांना तर सहाच्या दरम्यान आकाश राजु चव्हाण (वय १० घनातांडा) असे एकूण १३ जणांना विषबाधा झाली आहे.
यावेळी विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.शहाजी कुरे, अपरिचारिका प्रियंका जाधव, शिल्पा केळकर अश्विनी जाभाडे, राहुल गायकवाड, अशिष जाभाडे आदींनी उपचार केले.जिल्हा आरोग्य अधिकारी संगिता देशमुख, सहाय्यक जिल्हा अधिकारी संतोष सुर्यवंशी,तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार आदींनी संबंधित आश्रम शाळेस भेट देवून तपासणी केली.तेथील शिजवलेली खिचडी,पिण्याचे पाणी,असलेल्या डाळी,तांदूळ यांचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.विद्यार्थ्यांच्या तब्येतेवर लक्ष ठेवण्यास ठीक आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे.