चित्रपट चालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचीच चाणक्यनिती; नरेश म्हस्के यांचा आव्हाडांवर पलटवार | पुढारी

चित्रपट चालण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांचीच चाणक्यनिती; नरेश म्हस्के यांचा आव्हाडांवर पलटवार

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : मला जर चाणक्य म्हणत असतील तर चित्रपट चालावा यासाठी जितेंद्र आव्हाडच चाणक्यनितीचा वापर करत आहेत, असा पलटवार शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला. आव्हाड यांचे राष्ट्रवादीमध्ये महत्व कमी झाले असून त्यामुळेच आव्हाड अशाप्रकरची स्टंटबाजी करत असल्याचा आरोपही म्हस्के यांनी केला आहे.

हर हर महादेव चित्रपटावरून सुरू झालेला वादंग आणि राजकीय आरोप प्रत्यारोप अद्यापही सुरूच आहेत. शिंदे गटाचे प्रवक्ते म्हस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, “मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी मला चाणक्याची उपमा दिली. मी आव्हांना मित्र आणि नेता समजायचो पण त्यांनीच मला मोठी उपमा दिली. आव्हाड यांचे राष्ट्रवादीमध्ये महत्व कमी झाले आहे. त्यामुळे ते लक्ष वेधण्याकरीता हे सर्व करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

महाविकास आघाडीचे सरकार असताना आव्हाडांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाला, पण अटक झाली नाही. त्यामुळे दबाव कुठल्या शासनाच्या वेळेस होता, हे आता सर्वांच्या लक्षात आले असेल. एखाद्यावर आरोप करताना विचार करुन करायला पाहिजे. याआधीच्या सरकारमधील गृहमंत्री खंडणी गोळा करत होते. माजी मंत्र्यांच्या सर्व खात्यांची चौकशी केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय लवकरच येईल, असेही म्हस्के म्हणाले.

उड्डाणपुलाचे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे यांचेच

काम झाले नाही तर दोष सरकारला दिला जातो, मग काम झाले तर श्रेयही घेऊ द्या, असा टोला म्हस्के यांनी आव्हाड यांना लगावला. महापौर, सभागृह नेता असताना पुलाच्या कामाचा पाठपुरावा केला होता. वाईटाचे श्रेय आम्हाला देत असाल तर चांगल्याचे श्रेय पण द्या. त्यामुळे हे श्रेय खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेच असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button