Kidnapping in Dombivli : वाढदिवसाच्या पार्टीचे कारण सांगून मित्राचे अपहरण | पुढारी

Kidnapping in Dombivli : वाढदिवसाच्या पार्टीचे कारण सांगून मित्राचे अपहरण

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: मित्राच्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्या मित्राला आपण जल्लोषात वाढदिवसाची पार्टी करू, असे सांगून त्याचे अपहरण (Kidnapping in Dombivli) करणाऱ्या मित्रांविरोधात डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्याला नवी मुंबई येथे नेऊन त्याच्याजवळील मोबाईल, रोख ५ हजार रुपये काढून घेतले. त्याच्या कुटुंबीयांकडे मुलगा जिवंत पाहिजे असेल, तर २० हजार रुपयांची खंडणीची मागणी केली. पैसे दिले नाहीत, तर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शनिवारी (दि.१४) रात्री ८ ते रविवारी (दि.१५) दुपारी २ वाजताच्या दरम्यान हा प्रकार डोंबिवली पूर्वेतील आयरे गाव स्मशानभूमी रस्ता शिवा स्कॅप मार्ट ते नवी मुंबईतील खारघर दरम्यान घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी आकाश राम आणि तिन्ही आरोपी एकाच भागात राहत असल्याने एकमेकांना परिचित आहेत. आकाश भंगार विक्रीचा व्यवसाय करतो. त्यामुळे त्याच्याजवळ भरपूर पैसे असल्याचा आरोपींचा समज होता. आकाशचा वाढदिवस असल्याने आपण त्याच्याकडून मेजवानीच्या ना‌वाखाली पैसे उकळू, असा कट आरोपी वांग्या, जगू आणि संकेत यांनी आखला. आरोपींनी आकाशला शनिवारी रात्री आठ वाजता घराबाहेर मोबाईल करुन बोलावून घेतले. मित्र बोलवितात म्हणून तो घराबाहेर आला. आरोपींनी आकाशला आपण तुझ्या वाढदिवसाची मेजवानी साजरी करू, असे सांगितले.

आकाश त्यास नकार देऊ लागला. हे बोलणे सुरू असतानाच तिन्ही आरोपींनी आकाशला जबरदस्तीने एका रिक्षेत बसविले. आकाशने त्यास प्रतिकार केला. पण आरोपींनी त्याला घट्ट पकडून ठेवले होते. रिक्षेत बसल्यावर आकाशकडील मोबाईल, पाकिटातील ५ हजार रुपये आरोपींनी काढून घेतले. आकाश आरोपींच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी वांग्याने आकाशला बंदुकीचा धाक दाखवून मारण्याची धमकी दिली. आपले अपहरण केले जात आहे, याची जाणीव झाल्यावर आकाश घाबरला. त्याची आरोपीच्या तावडीतून सुटण्याची धडपड सुरू होती. आरोपी त्याला सोडत नव्हते.

आरोपींनी रिक्षा सुसाट वेगाने नवी मुंबईतील खारघर भागात नेली. या भागात आकाशला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी, पट्टयाने बेदम मारहाण करण्यात आली. एकटाच असल्याने तो काही करू शकत नव्हता. त्यानंतर आकाशाच्या घरच्यांना फोन करून मुलगा जिवंत हवा असेल. तर २० हजार रुपये द्या, असे सांगितले. त्यानंतर आकाशच्या कुटुंबीयांनी राम नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र त्यानंतर आपले पितळ उघडे पडेल, असे लक्षात येताच आकाशला रस्त्यात सोडून तिघे आरोपी पळून गेले.

Kidnapping in Dombivli : व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण

मौजमजा, झटपट श्रीमंत होण्यासाठी डोंबिवलीतील बेरोजगार तरुण एकत्र येऊन व्यावसायिकांचे अपहरण करत असल्याने व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील एका फर्निचर विक्रेत्याचे ५० लाखाच्या खंडणीसाठी चार जणांनी अपहरण केले होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button