ठाणे : भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाचा खून, एकाला अटक
नालासोपारा; पुढारी वृत्तसेवा : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना विरार गोपचर पाडा येथे घडली. सद्दाम मन्सूरी ( ३० रा. चंदनसार रोडवरील साईदत्त नगरमधील झोपडपट्टीत) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. संशयित आरोपी दानिश शेख (२५) याला पाेलिसांनी कुर्ला येथून सोमवारी रात्री ताब्यात घेतले. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सद्दाम मन्सूरी हा मित्र मुमताज आणि अन्वरुल यांच्यासोबत गोपचरपाडा येथील मेडिकल समोर उभा हाेता. मित्र अन्वरुल याच्यासोबत दानिश शेख याचे भांडण झाले. भांडण सोडवण्यासाठी सद्दाम गेला. आरोपीनेचाकूने सद्दामच्या पोटाच्या डाव्या बाजूला आणि पाठीवर वार केले. सद्दामला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी सद्दामचा भाऊ हैदरअली (३८) यांनी विरार पोलीस ठाण्यात सोमवारी तक्रार दिली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी आरोपी दानिश शेख (२५) याला कुर्ला येथून सोमवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला विरार पोलिसांच्या ताब्यात तपासाला देणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.