डोंबिवली : चोरीसाठी सुरक्षा रक्षकाची हत्या; मानपाडा पोलिसांचा ८ तासांत गुन्ह्याचा छडा | पुढारी

डोंबिवली : चोरीसाठी सुरक्षा रक्षकाची हत्या; मानपाडा पोलिसांचा ८ तासांत गुन्ह्याचा छडा

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा: एका सुरक्षा रक्षकावर प्रहार करून बंद असलेल्या पेपर कंपनीत प्रवेश करून बंद खोलीतील भंगारातील १ लाख ५० हजारचे लोखंड चोरल्याची घटना घडली होती. यावेळी सुरक्षा रक्षक ग्यानबहादुर गुरूम याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात मानपाडा पोलिसांनी केवळ ८ तासात गुन्ह्याची उकल करून दोन जणांना अटक केली. रिक्षाचालक टोनी थॉमस डिसिल्वा ऊर्फ शिवा सोमा हिलम (वय ३०, रा. सूचक नाका) आणि भांगरचा व्यवसाय करणारा फिरोज इस्माईल खान (वय ३०, रा. कोळसेवाडी, कल्याण पूर्व) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर फरार असलेल्या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, बुधवारी सकाळी एमआयडीसी परिसरातील विजय पेपर मार्ट या बंद कंपनीत एक सुरक्षा रक्षक मृत अवस्थेत पडल्याची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसरातील सीसीटीव्हीची तपासणी केली. यावेळी बांधावरून तीन जणांनी कंपनीमध्ये उडी मारून प्रवेश केल्याचे निदर्शनास आले. तर पुन्हा त्या सीसीटीव्हीमध्ये बंद कंपनीतून आणलेले चोरीचे सामान एका रिक्षेतून घेऊन जाताना हे आरोपी दिसल्याने त्या दृष्टीने शोध सुरू केला.

त्यानंतर रिक्षाची तपासणी केली असता त्यावर एबीपी मॅरेज नावाचे पोस्टर चिकटवलेले दिसले. याच पोस्टरवरून आजबाजूच्या परिसरातील रिक्षांचा शोध घेतला असता तेथून एक रिक्षा बाहेर पडताना दिसली. रिक्षेवरील पोस्टर देखील फाटलेल्या स्थितीमध्ये होते. तसेच रिक्षा चालक देखील पोलिसांना बघून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. यामुळे संशय बळावल्याने त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर नेमका कशा पद्धतीने गुन्हा केला याची कबुली टोनी याने पोलिसांना दिली. कंपनीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर सुरक्षारक्षकाने आम्हाला बघितले आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्याने कंपनीच्या परिसरातच पडलेला रॉड उचलून त्याच्या डोक्यात मारल्याचे त्यांनी सांगितले. सध्या त्याच्याबरोबरचे आणखी दोन जण फरार असून शोध सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी दिली.

पोलिसांनी केले आवाहन

एमआयडीसी परिसरातील जवळपास ८७ कारखाने बंद अवस्थेत आहेत. या कारखान्याचा परिसर मोठा असल्याने याठिकाणी ठेवलेला एक सुरक्षारक्षक अपुरा आहे. त्यामुळे दोन सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात यावी. ही सर्वस्वी जबाबदारी कारखानदारांची आहे. यापुढे अशा घटना घडल्यास कारखानदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहायक उपायुक्त सुनील कुऱ्हाडे यांनी दिला आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button