करमाळा; पुढारी वृत्तसेवा: नातेवाईकांच्या लग्नाहून परत येताना झालेल्या कार आणि मोटरसायकलच्या अपघातात दोघे मामे भाऊ ठार झाले. कर्जत करमाळा रस्त्यावर कोरेगाव शिवारात सटवाई फाट्याजवळ (ता. कर्जत, जि. अहमदनगर) हा अपघात बुधवारी (दि.२६) झाला होता.
मृतांची नावे
तुषार उर्फ गणेश पांडुरंग बेद्रे (वय ३२) व शिवम सचिन चांदगुडे (वय १९, दोघे रा. देवीचा माळ, करमाळा, जि. सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुषार बेद्रे याचा मामेभाऊ शिवम हे दोघे जवळच्या नातेवाईकांच्या लग्नाला कर्जत येथे गेले होते. लग्न उरकून करमाळ्याच्या दिशेने परतत असताना चारचाकी वाहन (एम. एच. 12 एल. जे. 3527) आणि मोटरसायकलचा (एम. एच. 12 जे एक्स. 2638) भीषण अपघात झाला. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मृत्यू झाला.
कर्जत पोलीस ठाण्यात निखिल तात्या धांडे यांनी फिर्याद दिली. कर्जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे करीत आहेत.
तुषार बेद्रे हा करमाळा बस आगारामधील कार्यशाळेत नोकरीला होता. तर शिवम चांदगुडे नुकताच बारावीची परीक्षा ८० टक्के गुणाने उत्तीर्ण झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी कर्जत येथील महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला होता. तुषार बेद्रे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. तर शिवम याच्या पश्चात आई-वडील दोन बहिणी असा परिवार आहे. शिवम याचे वडील हे हमाली करत असून तो एकुलता एक असल्याने त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.