

सोलापूर : शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अनिवार्यता, नवीन संच मान्यतेच्या जाचक अटीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांनी सामूहिक रजा घेऊन, शाळांना दांडी मारुन शुक्रवारी (दि. 5) जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो शिक्षकांनी मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक संघटनांचा समावेश होता.
जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांनी दुपारी दोनच्या सुमारास चार पुतळा येथून मोर्चाला सुरुवात केली. पार्क चौक, सिद्धेश्वर प्रशाला येथून मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज गेट येथे आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. यावेळी विविध शिक्षक संघटनेच्या अध्यक्षांनी टीईटी, जाचक संच मान्यता, अशैक्षणिक कामे बंद करावीत, अशी मागणी केली. पदोन्नती प्रक्रिया, कंत्राटी कर्मचारी भरती धोरणामुळे राज्याच्या शिक्षण क्षेत्रात अस्वस्थता निर्माण झाली आहे. प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
यावेळी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे नेतृत्व करणार्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, शिक्षक संघ थोरात गट, जुनी पेन्शन संघटना, पदवीधर व केंद्रप्रमुख शिक्षक सभा, शिक्षक भारती, मागासवर्गीय शिक्षक संघटना, शिक्षक संघ, कास्ट्राईब शिक्षक संघटना तर माध्यमिक शिक्षकांच्या टीडीएफ, मुख्याध्यापक महामंडळ, शिक्षक कृती समिती, अखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षक महासंघ, एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना आदी संघटनेचे पदाधिकारी, शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
यावेळी माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, सुभाष माने, तानाजी माने, सुरेश पवार, अनिरुद्ध पवार, राम शिंदे, नवनाथ गेंड, बापूसाहेब अडसूळ, सचिन झाडबुके, मच्छिंद्र मोरे, कृष्णा हिरेमठ, गिरीश जाधव, सुरेश राठोड, शामराव जवंजाळ, सुधीर कांबळे, श्रीशैल कोरे, मच्छिंद्र भांडेकर यांच्यासह जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
टीईटी, जाचक संच मान्यतेसह इतर मागण्यांसाठी सर्व शिक्षक संघटना एकत्रित येऊन जिल्ह्यातील काही अपवाद वगळता इतर सर्व शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.