

सोलापूर : सोलापूर महानगरपलिका निवडणुकीत बंडखोरी केलेल्या उमेदवारांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कारवाईचा इशारा दिला. जे कोणी बंडखोर आहेत त्यांनी आपल्या पक्षाच्या उमेदवाराला तत्काळ पाठिंबा द्यावा, अन्यथा पक्ष शिस्तभंगाची कारवाई करावी लागेल, असा सज्जड इशाराच त्यांनी दिला. जुळे सोलापुरातील जामगुंडी लॉन येथे सोमवारी (दि. 5) कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष चव्हाण बोलत होते.
प्रांरभी भाजपच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. विजयकुमार देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. देवेंद्र कोठे, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण उपस्थित होते. राज्य आणि जिल्हा पातळीवरील अनेक समित्या आहेत. पालिकेत सत्ता आल्यानंतर तेथेही संधी मिळू शकते याचा विचार बंडखोरांनी करावा. कार्यकर्त्यांना दिलेली जबाबदारी प्रत्येकाने पार पाडावी, मतदारांपर्यंत पोहोचवावे. पंंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसांतील 16- 16 तास काम करतात. कार्यकर्त्यांनीही याच पद्धतीने पक्ष कार्याला वेळ दिला पाहिजे, असे आवाहन करत चव्हाण म्हणाले, वर्षानुवर्षे पक्षासाठी कार्य केलेल्या कार्यकर्त्यांवर बंडखोरी केली म्हणून कारवाई करावी याचे वाईट वाटते. त्यामुळे बंडखोरी मागे घेण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले.
केंद्र आणि राज्यांमध्ये पारदर्शक पद्धतीने भाजप आणि मित्र पक्षांचा कारभार सुरू आहे. देशाची आणि राज्याची जोरदार प्रगती सुरू आहे. सोलापूरकरांनी ही या प्रगतीमध्ये आपले योगदान देत सोलापुरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केले.लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी नेरेटिव्ह सेट केल्याने आपला पराभव झाला. निवडणुकीत गाफिल राहिले की धोका होतो. पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे आहे. एकजुटीने निवडणूक जिंकण्यासाठी प्रामाणिक काम करण्याचे आवाहनही चव्हाण यांनी केले. मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत आपण घवघवीत यश मिळवू असे आ. विजयकुमार देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात स्पष्ट करत भाजप पक्षाच्या जागा मागच्या वेळेला पेक्षा यंदा नक्कीच वाढतील असा दावाही केला. कमळ हाच आपला उमेदवार समजून प्रत्येकाने कमळालाच मतदान करावे, या दृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन आ. देवेंद्र कोठे यांनी केले.