

Farmers are opposing Shaktipeeth Highway
करकंब : शक्तिपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा आणि त्यांना उद्ध्वस्त करणारा राक्षसी प्रकल्प असल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी गुरूवारी (दि.३०) राज्य सरकारवर केला. सोलापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गासाठी नव्याने आखलेल्या मार्गाला मोठ्या प्रमाणावर विरोध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पंढरपूर तालुक्यातील करकंब तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांचे आक्रोश मेळावे आयोजित करण्यात आले. या मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.
पिढ्यान्पिढ्या चालत आलेली उपजीविकेची जमीन गमावल्यास भवितव्य अंधारमय होईल, याची जाणीव शेतकऱ्यांना झाल्यामुळे त्यांचे मनोबल वाढले आहे. ‘काळ्या आई’च्या रक्षणासाठी कोणतीही किंमत मोजण्याची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली असून त्यांनी एकजुटीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
माढा आणि पंढरपूर तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी शेट्टी यांच्या सभेला उपस्थित होते. करकंब परिसरातील सुमारे 400 एकर द्राक्षबागा आणि 100 हून अधिक शेततळी बाधित होणार असल्याने येथील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे.
यावेळी बोलताना शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग हा जनतेच्या गरजेचा नसून काही पुढाऱ्यांच्या फायद्यासाठी राबवला जात असल्याचा आरोप केला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक व्यवहारांसाठी हा प्रकल्प पुढे आणला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानुसार अन्यायाविरुद्ध लढण्याचा अधिकार असल्याचे सांगत, जमिनीच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांनी एकजुटीने संघर्ष करण्याचे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शेतकरी, बागायतदार आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते.
जिल्ह्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील बहुतांश आमदार शक्तीपीठ महामार्गाच्या बाजूने असल्याचा आरोप करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहणारे प्रतिनिधी फारसे दिसत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.