

सोलापूर : सुशील नगर येथील मायलेकीने रविवारी (दि. २६) पहाटे ४ वाजता धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली होती. यामागे कौटुंबिक वादाचे कारण असल्याचे पोलिसांनी सांगितले. वर्षा पांडुरंग आधटराव (वय ३३) व मुलगी स्वरा पांडुरंग आधटराव (वय १४) यांनी रेल्वे रूळावरून चालत जात आत्महत्या केली होती. याप्रकरणी कोणाचाही अद्याप जबाब नोंदवण्यात आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधटराव यांच्या घरात कौटुंबिक वाद होता. तेव्हा वर्षा आणि मुलगी स्वरा या दोघींना पती पांडुरंग याने रात्री कमला नगर येथे राहत असलेल्या मावशीच्या घरी सोडले होते. तेव्हा दोघी तिथून निघून गेल्या. ही बाब मावशीने पांडुरंग यांना कळवली. पहाटे दोघींचा मृतदेह टिकेकरवाडी रेल्वे स्टेशनच्या जवळ आढळून आला. मुलगी स्वरा ही शाळेत शिकत होती. वर्षा आधटराव यांना आणखी एक मुलगी आहे. ती मात्र वाचली.
कौटुंबिक वादाच्या रागातून वर्षा बाहेर पडल्या. त्यांना थांबविण्यासाठी स्वरा त्यांच्या मागे गेली. दोघीही कंबर तलावाजवळून खाली उतरून रेल्वे रुळांच्या दिशेने गेल्या. यानंतर रूळावरून चालत जाताना भरधाव रेल्वेपासून बचाव करण्याच्या प्रयत्नात वर्षासह स्वराला रेल्वेची धडक बसली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी अद्याप कोणाचाही जबाब नोंदविण्यात आलेला नसल्याचे तपास अधिकारी बहिर्जे यांनी सांगितले.