

महूद : सांगोला तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या महूद परिसरात चोऱ्या, दरोडे, हाणामाऱ्या, खून आणि सततची वाहतूक कोंडी यांसारख्या गंभीर घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. वाढत्या गुन्हेगारीवर चाप बसावा आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महूद येथे स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करावे, अशी ठाम मागणी महूदसह परिसरातील २३ गावांतील ग्रामस्थ, व्यापारी आणि शेतकरी यांच्याकडून केली जात आहे.
महूद हे जत-मुंबई राष्ट्रीय महामार्ग आणि पंढरपूर-मल्हारपेठ राज्य महामार्गाच्या मुख्य चौकात वसलेले गाव आहे. परिसरातील २३ लहान-मोठी गावे आणि वाड्या-वस्त्यांचा दैनंदिन संपर्क महूदशी येतो. येथील शेतीमाल परराज्यात पाठवला जात असल्याने व्यापारी, कामगार व ऊसतोड मजुरांचा येथे मोठा वावर असतो. अनेक बँक, पतसंस्था, शाळा-कॉलेज आणि शासकीय कार्यालये येथे कार्यरत आहेत. टवाळखोर तरुणांचा (रोड रोमिओ) त्रास विद्यार्थिनींना सहन करावा लागत आहे.
या त्रासाला कंटाळून काही विद्यार्थिनींनी शिक्षण सोडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथून कोकण, सातारा, सांगली येथून पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो भाविकांचा हाच मुख्य मार्ग आहे. या सर्व कारणांमुळे महूद परिसर नेहमी गजबजलेला असतो. मात्र, याच नागरीकरणाचा फायदा घेत गुन्हेगारांचे धाडस वाढले आहे.