सांगोला : पुढारी वृत्तसेवा
सांगोला तालुक्यात प्रतिकूल वातावरणामुळे सर्वत्र डेंगूसद़ृश आजार मलेरिया, थंडी, ताप, खोकला, अंगदुखी, जुलाब, उलट्या, घसा खवखवणे आदी साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे घरोघरी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. सद्या खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झाले असून उपचारासाठी बेड शिल्लक नसल्याचे चित्र आहे. मात्र, शासकीय रुग्णालयातील डॉक्टर्स व कर्मचारी यांच्या दुर्लक्षतेमुळे ग्रामिण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रे याकडे रुग्ण चांगल्या पद्धतीने उपचार होत नसल्याने फिरकत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
सांगोला येथील ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रे अशी मोठी शासकीय यंत्रणा आहे; परंतु या ठिकाणी डॉक्टर्स निवासी राहत नाहीत तसेच कर्मचारी ही निवासी राहत नाहीत. दवाखान्यातील कामाकडे दुर्लक्ष करून आपली विविध लाभाची कामे करतात तसेच शासकीय सेवेत असणार्या डॉक्टरांचेही खासगी दवाखाने आहेत. या सर्व कर्मचार्यांचे शासकीय दवाखान्याकडे दुर्लक्ष होते. तालुक्यात सर्वत्र डासांचे प्रमाण वाढले आहे. त्याचप्रमाणे पाण्याची चवही बिघडली आहे. यामुळे सर्वच रोगांची लागण तालुक्यात झाली आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे काळाची गरज आहे.
ग्रामिण रुग्णालय सांगोला तसेच जवळा, घेरडी, महुद, कोळा, नाझरा, अकोला येथील आरोग्य केंद व उपकेंद्राच्या अधिकार्यांना साथीच्या आजाराचे कुठलेच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. येथील शासकीय दवाखान्यामध्ये डॉक्टर व कर्मचारी उपस्थित नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तेथे असलेले कर्मचारी ग्रामिण रुग्णालय व आरोग्य केंद्र तसेच आरोग्य उपकेंद्रात उपस्थित राहत नाहीत. रूग्णांना सरकारी औषधोपचार मिळत नसल्यामुळे सर्वसामान्य गोरगरीबांना उपचारापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यावरून आरोग्य यंत्रणेला कुणाचाही धाक नसल्याने आधिकारी व कर्मचार्यांची मुजोरी वाढलेली दिसून येत आहे. प्रत्येक रुग्णांचे वेगवेगळ्या आजाराचे निदान होत असल्याने रुग्णांना दुसराच काही आजार झाल्याची भिती निर्माण होत आहे. त्यामुळे इतर तपासण्या आणि चाचण्या केल्यास त्याचाही आर्थिक भूर्दंड रूग्णांना सोसावा लागत आहे. त्यामुळे सावध राहण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत. आरोग्य विभागाने यावर तत्काळ पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांतून होत आहे. सततच्या पावसाळ्यामुळे साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रत्येक घरात रुग्ण दिसत आहेत. साथीच्या आजारावर आरोग्य विभागाकडून कुठल्याही उपाययोजना केलेल्या दिसत नाहीत. शासकीय दावाखान्यात कधी वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे रूग्ण चांगलेच वैतागले आहेत. आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेने सर्व आरोग्य सुविधा उपलब्ध कराव्यात. तसेच वैद्यकीय अधिकार्यांसह कर्मचार्यांना समज द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहेत.
आरोग्य विभागाच्या प्रमुख आधिकार्यांसह कर्मचार्यांनी आपल्या मुख्यालयी राहणे कायद्याने बंधनकारक आहे. असे असताना देखील तालुक्यातील आरोग्य उपकेंद्रात अनेक डॉक्टर कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. बहुतेक सर्वजन बाहेर गावाहून ये-जा करत असल्याने रात्री-अपरात्री रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वरिष्ठ अधिकार्यांनी या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच वरिष्ठांनी तत्काळ लक्ष देऊन कर्मचारी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सर्वसामान्य जनतेमधून केली जात आहे.