सोलापूर : पंचतत्त्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरू केलेल्या माझी वसुंधरा 4.0 स्पर्धेत कामती खु. (ता. मोहोळ) ग्रामपंचायतींने राज्यात दुसरा तर मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचातींने पुणे विभागात प्रथम क्रमाकांचा पुरस्कार पटकाविला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी जिल्ह्यातील जास्तीत-जास्त ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळावा यासाठी विशेष मेळावा, शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले होते. त्यामुळे कामती खुर्द ग्रामपंचायतीला राज्यात दुसरा क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्या ग्रामपंचायतीस 75 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. मंद्रुप ग्रामपंचायतीने पुणे विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. या ग्रामपंचायतीस 50 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहेत. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान पुरस्कारातून जिल्ह्यास एक कोटी 25 लाख रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. त्या रक्कमेतून गावात विविध कामे करावी लागणार आहेत.
माझी वसुंधरा अभियान 4.0 मध्ये राज्यातील 414 नागरी स्थानिक संस्था, 22 हजार 218 ग्रामपंचायती अशा एकूण 22 हजार 632 स्थानिक संस्थांनी सहभाग घेतला होता. त्यातून सोलापूरच्या दोन ग्रामपंचायतींनी यश मिळविले आहे. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतींचे कौतुक होत आहे.