

सांगोला : येथील नगरपालिकेची निवडणूक सर्व पक्षांच्या नेते मंडळींनी एकत्र येऊन लढवणे अपेक्षित होते; मात्र विरोधकांनी त्यांचा उमेदवार जाहीर केल्याने ही निवडणूक लागली, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) माजी आ. शहाजी पाटील यांना लगावला. महाराष्ट्रातील सर्व शहरांचा विकास करण्यासाठी घनकचरा व अशुद्ध पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी केंद्र व राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या निधीचा योग्य वापर करण्यासाठी भाजप व मित्र पक्षांच्या सर्व उमेदवारांना बहुमताने विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप, शेकाप व दीपक साळुंखे गटाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौकात मुख्यमंत्री फडवणीस यांची जाहीर सभा झाली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार बाबासाहेब देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, आ. नारायण पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह नगराध्यक्ष व नगरसेवकपदाचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेली 54 वर्षे शेतकरी, कष्टकरी, कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी स्वर्गीय आमदार गणपतराव देशमुख यांनी आवाज उठवला. गेली 25 वर्षे त्यांचा सहवास मला लाभला. लोकशाहीने श्रीमंतांपासून गरिबांपर्यंत प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे. सांगोला नगरपालिकेसाठी सर्व नेत्यांनी एकत्र येऊन लढणे अपेक्षित होते. मात्र आमच्या विरोधकांनी प्रथम उमेदवारी जाहीर केल्याने निवडणुकीला सामोरे जावे लागले. सध्या महाराष्ट्रामध्ये 6 हजार 500 कोटी जनता ही शहरांत राहते. या शहरांचा विकास करायचा आहे. शहरांतील अतिक्रमणे केलेल्या नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर देण्याचे नियोजन आहे.
यावेळी दीपक साळुंखे -पाटील म्हणाले की, मी ज्या ठिकाणी असतो. त्यांचा विजय निश्चित असतो. म्हणूनच बाबासाहेब देशमुख आमदार झाले.यांनी सांगोला शहरांमध्ये गतवेळच्या आमदाराने मोठा निधी आणला अशी चर्चा आहे. पण हा निधी नेमका कुठे गेला? की टक्केवारीत गेला? हे जनतेने पाहावे. असा टोला लगावला. यावेळी आ. बाबासाहेब देशमुख यांनीही माजी आमदारांना मी खूप सहकार्य केले.त्यांचा मी मान राखतो म्हणून त्यांनी काहीही बोलू नये, अशी टिका केली.