

ईश्वरपूर : माझं मंत्रिमंडळ सध्या फुल्ल आहे. सध्या मंत्रिमंडळात कोणतीही जागा रिकामी नाही. माझ्याकडे कोणतीही व्हेकन्सी नाही... त्यामुळे तुम्ही बाकीची कोणाची (?) चिंता करू नका, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे स्पष्ट केले. आमदार जयंत पाटील यांच्या भाजपमधील कथित प्रवेशाच्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला. त्यांनी आमदार पाटील यांचा नामोल्लेख केला नाही. उरुण ईश्वरपूर पालिकेच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
गांधी चौकातील या सभेस मुख्यमंत्र्यांनी शहरासाठी पिण्याची पाणी योजना, सुधारित भुयारी गटार योजना, रिंग रोड यासह विकास कामांना एक पैसाही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली. महायुतीचे नगराध्यक्षपदाचे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्यासह आमदार, उमेदवार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी प्रचाराच्या निमित्ताने सगळीकडे जातो. पण आधीच तुम्हाला सांगतो की, मी कुठे कोणावर टीका करत नाही. टीका करण्याची गरज नाही. आम्ही जे बोलतो ते करतो. विकासकामांची जी आश्वासने देतो, ती पूर्ण करतो. शहराचे नाव उरुण ईश्वरपूर झाल्यानंतर पहिल्यांदाच शहरात आलो. नामांतराची अनेक वर्षे मागणी चालली होती, ती आम्ही पूर्ण केली आहे. तुम्ही मागितले आम्ही दिले. आम्ही आता तुम्हाला मागतो आहे, सर्व महायुतीचे उमेदवार निवडून द्या. आमची सत्ता आल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू.