सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तीन जण ठार | पुढारी

सोलापूर-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील तीन जण ठार

टेंभुर्णी; पुढारी वृत्तसेवा : पुणे – सोलापूर महामार्गावर अरण (ता.माढा) गावच्या शिवारात पुण्याकडे निघालेल्या दुचाकीस अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तिघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी (दि.४) पहाटे २.३० वा.सुमारास अरण गावच्या शिवारात यशवंत कॉटेज या हॉटेल जवळ झाला. तेजस सुरेश इंडी (वय २०), लिंगराज शिवनंद हळके (वय २४) व गणेश शरणप्पा शेरी (वय २३, तिघे रा.भवानी पेठ सोलापूर अशी मयतांची नावे आहेत.

याबाबत टेंभुर्णी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, यातील मयत तेजस सुरेश इंडी, लिंगराज शिवनंद हळके आणि गणेश शरणप्पा शेरी हे तिघे मित्र त्यांच्या मित्राची दुचाकी (क्र.एमएच.१३ डीझेड-९८२६) वरून पुण्याकडे निघाले होते. ते महामार्गावरील माढा तालुक्यातील अरण गावच्या शिवारात आले असता हॉटेल यशवंत कॉटेज जवळ पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील तेजस सुरेश इंडी व लिंगराज शिवनंद हळके हे दोघे जबर मार लागल्याने जागीच ठार झाले. तर त्यांचा मित्र गणेश शरणप्पा शेरी हा जबर जखमी झाला होता.त्यास सोलापूर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्यातील पीएसआय धनाजी ओमासे, अपघात पथकाचे एएसआय अभिमान गुटाळ, पो.कॉ. मकबूल तांबोळी हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच मोडनिंब येथे महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस कर्मचारी यांनी दोन मयत व जखमी यांना उचलून मयत यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर जखमीस सोलापूर येथे उपचारास पाठवून दिले.
हे तिघे मित्र सध्या पुणे येथे राहत होते. ते नातेवाईकांच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रम आटोपून ते पुण्याकडे परतत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. या अपघाताचा अधिक तपास एपीआय गिरीष जोग हे करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button