

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने 22 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे. 22 फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्ह्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोलापुरात दिली आहे. या संदर्भात शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
सध्या शेतकऱ्यांना वेळेवर आणि आवश्यक तेवढी वीज उपलब्ध करून दिली जात नाही. तसेच शेतकऱ्यांच्या वीजबिलात 37% वाढ केली आहे. मुळात शेतकरी आर्थिक अडचणीत असताना ही विज वितरण विभाग आणि महापारेषण यांच्या वतीने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडण्याची सुलतानी कारवाई सुरू झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला हमीभाव मिळत नाही, सोलापुरात कांदा, साखर यासारख्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळत नाही. तसेच सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून जात असलेल्या सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग तसेच रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या जमिनी कवडी मोल किमतीने शासनाकडून संपादीत केल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा अशी आमची मागणी आहे.
तर मराठवाडा विदर्भामध्ये कापसाची परिस्थिती दयनीय आहे. अतिवृष्टी, पिक विमा याची नुकसान भरपाई शासनाने शेतकऱ्यांना दिलेली नाही. अशा अनेक विषयावर राज्य शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. सरकारला वटनीवर आणण्यासाठी हे आंदोलन खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी जास्ती जास्त शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले आहे.
पोलिसांनी सहकार्य करावे; विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही
शेतकऱ्यांच्या हितासाठी हे आंदोलन होणार आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने शेतकऱ्यांना आंदोलनावेळी सहकार्य करावे तसेच सध्या बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जाताना आंदोलनाचा अडथळा होऊ नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी दुपारी 12 नंतर हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली आहे.
हेही वाचा :