सांगोला : नळ पाणीपुरवठा योजनेला वासूद गावाजवळ गळती; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
सांगोला; पुढारी वृत्तसेवा : शिरभावी ८१ गावच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेला वासूद गावाजवळ मोठी गळती लागली आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही गळती चालू झाली असून प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या अधिकाऱ्यांचे व ऑफिस मधील फोन बंद आहेत. यामुळे ही गळती कधी बंद होणार, हा संशोधनाचा विषय आहे.
शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेमधून मानेगाव टाकीकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनला वासूद गावाजवळील लक्ष्मी मंदिराजवळ वॉल तुटून पडला आहे. यामुळे या ठिकाणी रात्री एक वाजल्यापासून मोठी गळती लागली आहे.
स्थानिक नागरिकांनी याबद्दल कार्यालयात फोन लावला. परंतु सांगोला येथील कार्यालयातील फोन बंद लागला तर संबंधित अधिकाऱ्यांचे फोनही नॉटरिचेबल होते. तसेच काही जणांचे फोन बंद लागले आहेत. यामुळे रात्री झालेली पाईपलाईनला गळती सकाळी साडेआठ वाजेपर्यंत चालू होती. या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे व या योजनेवर अवलंबून असणाऱ्या गावांना ही गळती काढल्यानंतर किती दिवसांनी पाणी मिळेल हा संशोधनाचा विषय आहे .