खेड : पुढारी वृत्तसेवा
सातारा शहराचे प्रवेशद्वार असलेल्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एमआयडीसीकडे जाणार्या मार्गावर पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने भर रस्त्यावरच पाण्याचे तळे साचत आहे. त्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत होत असून पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित विभागाने तातडीने खड्डे मुजवावेत व रस्त्यावरील पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी वाहन चालकांसह नागरिकांनी केली आहे.
सातारा - कोरेगाव रस्त्यावरील बॉम्बे रेस्टॉरंट चौक सातार्याचे प्रवेशद्वार असून या मार्गानेच महामार्गावरील तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, एमआयडीसी आणि आसपासच्या ग्रामीण भागाकडे जाण्यासाठी वर्दळ असते. मात्र हे प्रवेशद्वार समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. चौकातील मुख्य रस्त्यावर खड्डे पडले असून त्यामध्ये पावसाचे पाणी तसेच सांडपाणी साचून तळी निर्माण झाली आहेत. चौकातील खड्ड्यांपासून सुमारे 20 ते 25 मीटर अंतरावर काँक्रीटीकरणाचा रस्ता केला आहे. परंतु मुख्य चौकाला मिळणार्या मार्गावर काँक्रीटीकरण सोडाच साधे डांबरीकरणही करण्यात आले नाही. तर मागील कित्येक वर्षांपासून या चौकात गटाराची समस्या सतावत आहे.
काही ठिकाणी अस्तित्वात असलेली गटारे चोकअप् झाली आहेत. चौकातील खड्ड्यांची मालिका असलेला भाग हा औद्योगिक विकास महामंडळ, रस्ते विकास महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपालिका यांच्या वादात रखडला असल्याचे बोलले जात आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी तसेच सांडपाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे सातत्याने अपघात होत असून वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. येथील चिखलामुळे वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे.
खड्डे, पाण्याची तळी, सांडपाणी निर्मूलनाचा अभाव व वाहतूक कोंडी यामुळे या चौकाला अवकळा आली असून या रस्त्यावर अवजड व ओव्हरलोडेड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. या मार्गावरील व्यावसायिकांकडे येणार्या ग्राहकांची वाहने ही रस्त्यावरच उभी रहात असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असते. या चौकातील खड्डे मुजवण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यातून वाट काढताना या ठिकाणी एखाद्याचा जीव गेल्यावर प्रशासन जागे होणार का? असा संतप्त सवाल स्थानिकांसह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.