![पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F06%2Fjammmmmmmmmm.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर शनिवार (दि. 1) पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. पुण्याकडे येणार्या वाहनांची संख्या वाढल्याने खंडाळा घाटातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. त्यामुळे अमृतांजन फुल ते खालापूर टोल नाका दरम्यान सुमारे आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
शनिवार- रविवारच्या सुट्या असल्याने सुट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक खाजगी वाहनांमधून घराबाहेर पडले आहेत. त्यातच रेल्वेचा देखील ब्लॉकमुळे काही गाड्या बंद आहेत. त्यामुळे त्याचा अतिरिक्त ताण हा द्रुतगती मार्गावरील वाहतुकीवर आला आहे. त्यामुळे शनिवारी पहाटे वाहतूक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले.
पुण्याच्या दिशेने जाणारी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईकडे जाणार्या वाहनांना खंडाळा बोगद्याजवळ थांबवत सर्व सहा लेन या पुण्याकडे जाणार्या वाहनांसाठी काही वेळेचा ब्लॉक घेत सोडण्यात येत होत्या. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने ही लोणावळा एक्झिट या ठिकाणी थांबवण्यात आली होती. दुपारच्या वेळी ही वाहतूक कोंडी थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती.
उन्हाळी सुट्ट्यांचे शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने अनेक पर्यटक आपल्या कुटुंबांसह व मुलांसह थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यासह कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत. तसेच कोकण किनारपट्टीला जाणारे अनेक पर्यटक हे कराड व कोल्हापूर मार्गे जात असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे शनिवारी पहाटेपासुनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीमुळे झाली होती.
हेही वाचा