सातारा : पुढारी वृत्तसेवा
पुणे-बंगळूर महामार्गावर असणार्या मोठाल्या खड्ड्यांची साखळी मृत्यूचा जबडा बनली आहे. ठिकठिकाणचे खड्डे जीवघेणे ठरत असून, ते चुकवण्याच्या नादात भरधाव वाहने एकमेकांवर आदळत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने खड्डे दुरुस्तीला टांग लावली असून, ही बेपर्वाई अनेकांच्या जीवाशी खेळत आहे.
सातारा ते पुणे या अंतरामध्ये महामार्गाला जागोजागी खड्डे पडले आहेत. सेवा रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. भुयारी मार्गांमध्ये तसेच बायपास रस्त्यांमध्ये पावसाचे पाणी साठून चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. शेकडो वाहने रस्त्यावरून जात असताना आदळत असून, वाहनांचे अपघात होत आहेत. या अपघातामध्ये जीवितहानी होत असून, खड्ड्यांमुळे वाहनांचेही प्रचंड मोठे नुकसान होताना दिसत आहे.
यासंदर्भात नागरिकांची नाराजी लक्षात घेऊन पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी ठेकेदार यांना बोलावून घेऊन योग्य ती समज दिली होती. 15 ऑगस्टपर्यंत रस्त्याची डागडुजी झाली नाही, तर संबंधित यंत्रणेवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा जिल्हाधिकार्यांनी दिला होता. जिल्हाधिकार्यांनी दिलेली ही मुदत संपून गेली आहे. त्या मुदतीत रस्त्यांची डागडुजी होणे अपेक्षित होते. मात्र, महामार्ग प्राधिकरणाच्या आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय... या धोरणामुळे महामार्गावर खड्डे जैसे थे आहेत. लाखो रुपयांचा टोल भरून जाणार्या वाहनांचे खड्ड्यांमुळे नुकसान होत असले, तरी वाहनधारकांना कोणी वाली नाही, अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे.
पुणे-बंगळूर महामार्गावर नीरा नदी ते शेंद्रे या अंतरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यात छोटे-मोठे खड्डे आहेत. विशेष म्हणजे महामार्गावर उजवीकडून वाहन ओलांडताना वाहनांचा वेग वाढतो. त्याच बाजूला असलेल्या कठड्यांशेजारी रस्त्याला मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.