![सातारा: दरे बुद्रुकमध्ये अंगावर भिंत कोसळून वृद्धा ठार](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F09%2Fdare.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील दरे बुद्रुक या गावात अंगावर दगडी भिंत कोसळून कुसुम मधु महामुलकर (वय ७०) या शेतकरी महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर मुक्ताबाई कृष्णा महामुलकर, पद्मावती कृष्णा महामुलकर (वय ५५) प्रभावती विश्वास मतकर (वय ५२) अशा तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. चार वर्षांपूर्वी मंजूर झालेले घरकुल वेळेत न मिळाल्याने या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
जावळी तालुक्यामध्ये कुडाळ विभागात गेल्या दहा दिवसापासून अतिवृष्टी होत आहे. आज (दि.१६) दुपारी अडीचच्या सुमारास मुसळधार पावसातच १० फूट उंचीची दगडी भिंत कोसळली. यात भिंतीच्या शेजारी बसलेल्या प्रभावती मतकर, मुक्ताबाई महामुलकर, कुसुम महामुलकर, पद्मावती महामुलकर यांच्या अंगावर दगडी भिंतीचा मलमा कोसळल्याने त्या गाढल्या गेल्या.
या घटनेनंतर तरुणांनी घराकडे धाव घेतली. यावेळी मलब्याखाली गाडलेल्या महिलांचा मोठ-मोठ्याने ओरडण्याचा आवाज ऐकू येत होता. तरुणांनी तीन महिलांना दगड माती बाजूला काढून मोठ्या शर्थीने बाहेर काढले. मात्र, कुसुम यांना बाहेर काढण्यात वेळ लागल्याने त्या बेशुद्ध झाल्या. तत्काळ चारीही जखमी महिलांना शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच कुसुम यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, कुसुम यांना चार वर्षांपूर्वी घरकुल मंजूर झाले होते. याचा प्रस्ताव प्रशासनाकडे गेल्या वर्षभरापासून मंजूर अवस्थेत पडून होता. त्यांना वेळेत घरकुल मिळाले असते. तर त्यांचा प्राण वाचला असता असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. प्रशासनाने गेल्या चार वर्षापासून मंजूर असलेले घरकुल वेळेत दिले नाही. त्याला प्रशासन जबाबदार आहे. संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सरपंचासह ग्रामस्थांनी केली. घटनास्थळी मेढा पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी भेट दिली. ग्रामसेवक व महसूल विभागाकडून पंचनामा करण्यात आला.
हेही वाचलंत का ?