

सातारा : साताऱ्यातील उरमोडी धरणालगत असलेल्या कामधी येथे आयशर टेम्पोचा एका मुलाकडून चुकून हॅन्ड ब्रेक निघाल्याने अनियंत्रित झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन महिलांसह एका बालिकेचा मृत्यू झाला. या अपघाताने अडागळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. लीलाबाई उत्तम अडागळे (वय ५६), मालुबाई सीताराम अडागळे (५०), कल्पना सागर आवळे (३६), गार्गी सागर आवळे (वय सहा) अशी त्यांची नावे आहेत. अन्य काही जखमी झाले आहेत. मात्र त्यांची नावे समजू शकली नाहीत.
कामथी येथील सीताराम अडागळे यांच्या कुटुंबातील नवीन गावठाणात (पुनर्वसित गावात) निमसोड (खटाव) या ठिकाणी लग्नकार्य चार दिवसांवर आहे. यासाठी येथील घर साहित्य जनावरे घेऊन साहित्य हलवण्याचे दोन दिवसांपासून काम सुरू होते. शुक्रवारी रात्री कुटुंबातील सहा सदस्य आयशर टेम्पोतून जनावरे भरत असताना केबिनमध्ये बसलेल्या मुलाकडून हॅन्ड ब्रेक निघाला व काही समजण्याच्या आतच गाडी बांधाच्या कडेला असलेल्या उतारावरून थेट धरणाकडे गेली. त्याठिकाणी पलटी झाली.
यावेळी केबिनमध्ये बसलेल्या महिलांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो यशस्वी झाला नाही. वाहनातील तीन महिला व एक बालिका जागेवरच दगावली. उर्वरित सदस्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना समजतात तत्काळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले तसेच आजूबाजूच्या गावातील ग्रामस्थ कासारथळ येथील ग्रामस्थ युवक यांनी जेसीबीने गाडीच्या खाली अडकलेल्यांना बाहेर काढले.