Maharashtra Political Crisis : मुंबईत बैठका; जायचे नक्की कुणाकडे;द्विधा मनःस्थितीतच खटावमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवाना

Maharashtra Political Crisis : मुंबईत बैठका; जायचे नक्की कुणाकडे;द्विधा मनःस्थितीतच खटावमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी रवाना

खटाव; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादी काँग्रेस (Maharashtra NCP crisis) पक्षात उभी फूट पडल्यानंतर बुधवारी मुंबईत दोन्ही गटांची बैठक पार पडत आहे. यामध्ये दादांच्या बैठकीला जायचे की साहेबांच्या बैठकीला उपस्थित राहायचे, अशा द्विधा मनस्थितीत खटाव तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. (Maharashtra Political Crisis)

आज दोन्ही गटाकडून (Maharashtra NCP crisis) मुंबईत बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. खटाव तालुक्यातूनही पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते बैठकीसाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत. काहींनी साहेबांच्या तर काहींनी दादांच्या गोटात सामील व्हायचा निर्णय घेतला आहे. काहींनी काहीच न ठरवता गाडी मुंबईच्या दिशेने दामटली आहे. मुंबईत पोहोचल्यावर तिथले वातावरण पाहून निर्णय घेण्याचे काही चाणाक्षांनी ठरवले आहे.

राजकारणात काम करताना राष्ट्रवादीच्या सर्वच नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अजितदादांशी अधिक संपर्क असतो. या सर्वांसाठी पवार साहेबांकडे जाण्याचा प्रसंग क्वचितच येतो. विकासकामांसाठी निधी मिळवणे, पक्ष कार्यकारिणीत पदे मिळवणे, निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळवणे, शासकीय कामात मदत मिळवणे अशा अनेक कामांसाठी सर्वांना अजितदादांकडे जावे लागते. आता पुन्हा ते उपमुख्यमंत्री होवून सत्तेत आल्याने यापुढेही हाच सिलसिला सुरु रहाणार आहे. त्यामुळे दादांच्या गोटात सामील व्हावे, असा एक मतप्रवाह तालुक्यात पुढे आला आहे. (Maharashtra Political Crisis)

दुसरीकडे राष्ट्रवादी म्हणजे खा. शरद पवार हे समीकरण यापुढेही कायम राहील. सर्वसामान्य जनता साहेबांच्याच पाठीशी राहिल. त्यामुळे भविष्यात तालुका स्तरावरील तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढताना सर्वसामान्य मतदारांचा विचार करावाच लागेल, अशी धारणा असलेले शरद पवार यांच्या गोटात सामील होण्याची शक्यता आहे. खटाव तालुक्यातील राष्ट्रवादी किती आणि कुणाकडे जाणार हे आज मुंबईत होणार्‍या बैठकांमधून दिसणार आहे.

उघड उघड न येता फोनवरून विचारणा

गेल्या दोन दिवसात पवार कुटुंबीय आणि खा. शरद पवार यांच्या कार्यालयातून तालुक्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना फोन करून कराड आणि मुंबईला बैठकीसाठी येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्वच पदाधिकारी उघड उघड एकत्र न येता फोनवरून एकमेकांच्या संपर्कात आहेत. एकमेकांना एकमेकांचा निर्णय विचारला जात आहे. (Maharashtra Political Crisis)

हेही वाचा !

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news