

मेढा: पुढारी वृत्तसेवा: सातारा-जावळी मतदारसंघातील जावळी हा राज्यात सर्वप्रथम दारूबंदी झालेला तालुका आहे. त्यामुळे कुणी कितीही आदळ आपट केली तरी दारुबंदी उठणार नाही. जे कोणी दारूबंदीसाठी उठाव करत असतील, त्यांना राजकीय व सामाजिक पाठिंबा मिळणार नाही, त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही, असे स्पष्टपणे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
जावळी तालुक्यातील मेढा परिसरातील पर्यटनाला चालना मिळत नसल्याने तालुक्यात पुन्हा दारू दुकाने सुरू व्हावीत, असा सूर उमटू लागला आहे. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, जावली तालुका हा माझ्या मतदारसंघातील दारूबंदी झालेली पहिला तालुका आहे. पण आता मेढा परिसरातील काही भागांत चोरून दारूविक्री होत आहे. यावर कारवाई होत नसल्याने काही लोकांनी येथे दुकाने सुरू व्हावीत, अशी भूमिका घेतली आहे. मुळात ही भूमिका चुकीची आहे. त्यांच्या या भूमिकेला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही. खरेतर व्यसनापासून सर्वांनीच दर राहिले पाहिजे.
व्यसनाला सर्वांचा विरोधच राहणार आहे. त्यांना कोणाचा पाठिंबा मिळेल, असे मला वाटत नाही. कुणी काहीही प्रयत्न करत असेल, तर त्याला राजकीय आणि सामाजिक पाठिंबा मिळणार नाही, तसेच त्यांचे कोणीही समर्थन करणार नाही. तालुक्यात दारूबंदी कायम राहिलीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे शिवेंद्रसिंहराजेंनी स्पष्ट केले.
हेही वाचा