

Jaykumar Gore vs Ramraje Naik Nimbalkar
सातारा: रामायणापासून महाभारतापर्यंत षड्यंत्र रचणारा शकुनी मामा कधीही जिंकला नाही. मग फलटणचा शकुनी सुद्धा जिंकणार नाही, असा टोला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रामराजे नाईक निंबाळकरांवर नाव न घेता लगावला. सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यामध्ये मार्डी गटाच्यावतीने मंत्री गोरे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
जिल्हा परिषद सदस्य होताना संघर्ष केला. त्यानंतर आमदार झालो. संघर्ष केला. एक ही वेळ अशी नाही की मी संघर्ष केला नाही. त्यामुळे परमेश्वराने सर्व गोष्टींवर मार्ग काढून दिला आहे. माण - खटाव च्या मातीचा सुपुत्र कधी झुकला नाही. कधी वाकला नाही. मी बारामतीची तडजोड केली असती तर माझ्या आमदारकीचा त्रास कमी झाला असता, मी फलटणशी आणि साताऱ्याशी तडजोड केली असती तर राजकारणातील संघर्ष, त्रास कमी झाला असता. मात्र, माण - खटावच्या मातीला स्वाभिमानाने उभे करू शकलो नसतो. त्यांना पाणी देऊ शकलो नसतो.
माझी बाजू सत्याची होती. सत्याला आयुष्य जास्त असते. मला संपवता संपवता मी संपलो नाही. मात्र, त्यांना संपावे लागले. त्यांना घरी बसावे लागले. त्यामुळेच मी स्वाभिमानाने उभा आहे. अनेकांना काळजी आहे. अनेकांनी केस मध्ये नाव आहे की नाही, माहिती नसताना जामीन घेऊन ठेवले. त्यामुळे जयकुमार गोरे कधीही चुकीची कारवाई कोणावर करणार नाही. सत्ता असली किंवा नसेल तरी सुद्धा कोणाच्या वाळक्या पाचोळ्यावर पाय देणार नाही.