[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]
सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यात ठिकठिकाणी वळीव पावसाचे थैमान सुरूच असून, शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी साताऱ्यासह माण, खटाव, वाई, खंडाळा आदी तालुक्यात टपोऱ्या गारांसह कोसळलेल्या वळवाने थयथयाट केला. ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटाने धडकी भरवलेल्या या पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या गारपिटीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला आहे.
वळीव पावसाचे जिल्ह्यात ठिकठिकाणी तांडव सुरू आहे. शुक्रवारी कोरेगाव तालुक्यात बोरजाईवाडीत एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला होता. शनिवारी सकाळपासूनच वातावरणात पुन्हा उष्मा निर्माण झाला. ढगांनी आभाळ काळवंडून गेले. दुपारनंतर तर वातावरणाचा मूड बदलला. जोराचे वारे वाहू लागले. ढगांचा गडगडाट व विजांचा लखलखाट सुरू झाला. साताऱ्यात सातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. विजांचा लखलखाट भेदरून टाकत होता. पावसाचे प्रमाण कमी होते; मात्र विजांचा कडकडाट जास्त होता. त्याचवेळी जिल्ह्यात माण, खटाव, वाई, खंडाळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार सरी कोसळल्या. या पावसात गारांनी झोडपून काढले.
माण तालुक्यातील मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोथे गावासह शिरवली, कुळकजाई या डोंगराळ भागात गारांसह जोरदार पाऊस झाला. पावसाने काढणीला आलेला कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी आंब्याच्या बागांचेही नुकसान झाले आहे. शनिवारी दुपारी जास्त उष्मा जाणवू लागला होता. वाढत्या उष्म्याने नागरिक हैराण झाले होते. सायंकाळी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यातील कुलकजाई, बोथे, गाडेवाडी, मलवडी या माणच्या पश्चिम भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सर्वत्र मोठ्या गारांसह पाऊस झाल्याने शेतात उभ्या असलेल्या कांदा व ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या आंब्यांच्या बागेतील आंबे झडल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
हेही वाचा