

वाई; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आर-पारची लढाई चालू आहे. पुराव्यांचा प्रश्न निर्माण करणारे कुणबी मराठा हा पुरावा मिळायला लागल्याने ओबीसी समाजाला हाताशी धरून आरक्षण विरोधी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकल मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही. छगन भुजबळ यांच्याकडून भडकावू वक्तव्य केली जात आहेत. त्यांना लगाम घालावा; अन्यथा मराठा समाजाचा उद्रेक शासनाला परवडणारा नसेल, असा इशारा मराठा संघर्ष योध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी दिला.
वाई येथील छत्रपती शिवाजी चौकात आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, जरांगे-पाटील तुम आगे बढो मराठा समाज तुमच्या पाठीशी अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले, समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची नितांत गरज आहे. मराठ्यांना कोणाच्याही वाट्याचे आरक्षण नको आहे, तर हक्काचे आरक्षण हवे आहे. काही जणांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असून तो आपल्याला हाणून पाडायचा आहे.
राज्य शासनाला मराठा समाजाला आरक्षण द्यावेच लागेल त्याशिवाय हा लढा थांबणार नाही. आरक्षण मिळाल्यानंतरच स्वतःच्या घरात पाऊल ठेवणार आहे. मराठा समाजाला विरोध करण्यासाठी टोळ्या समोर येत आहेत. आपला लढा सुरू ठेवण्यासाठी 1 डिसेंबरपासून गाव तिथे साखळी उपोषण सुरू करा.
ओबीसी समाजाच्या सर्वसामान्य लोकांचा या आरक्षणाला कसलाही विरोध नाही. जागो जागी मराठा बांधवांबरोबर ओबीसी समाजातील तरुणसुद्धा स्वागताला पुढे येत आहेत. छगन भुजबळांसारखे काही नेते जाणीव पूर्वक खालच्या पातळीवर वक्तव्य करून दोन समाजात वितुष्ठ आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
आरक्षणासाठी मराठा समाजाला झुलवत ठेवण्याचे षडयंत्र रचले गेले. त्यात अनेक पिढ्या बरबाद झाल्या, समाजाचे अतोनात नुकसान झाले. मराठा समाजाची आरक्षणाच्या प्रश्नावर त्सुनामी आली आहे. ती आता सरकारला पेलणार नाही, निदान पुढच्या पिढीच्या उत्कर्षासाठी आरक्षण लढा तीव्र करा, असेही जरांगे-पाटील म्हणाले.