सातारा : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला गौरवशाली पंरपरा आहे. देश-विदेशातून या सोहळ्यासाठी भाविक येतात. पालखी सोहळ्याच्या इतिहासात लाठीमाराची घटना कधीच घडली नव्हती. वारकर्यांचे सोहळ्यासाठी नेहमीच सहकार्य असते. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच ही घटना घडली असून, वारकर्यांवर झालेला लाठीहल्ला क्लेशदायक असल्याची खंत राज्याचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी सातार्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
आ. अजित पवार म्हणाले, मी साडेबारा वर्षे पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम केले आहे. पालखी सोहळ्याच्या इतिहासात यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. पालखी सोहळ्याच्या नियोजनाला वारकर्यांचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. सातारा, पुणे, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नियोजन बैठक घ्यायचो. योग्य नियोजनातून काम केल्यास असले प्रकार घडत नाहीत.
आळंदी येथे वारकर्यांवर झालेला लाठीहल्ला ही गोष्ट माझ्यासाठी क्लेशदायक आहे. आषाढी वारीला गौरवशाली पंरपंरा आहे. या पालखी सोहळ्याला देशविदेशातून भाविक सहभागी होत असतात. प्रशासनाच्या गैरव्यवस्थापनामुळेच हे घडले असावे. ही घटना मनाला चीड आणणारी आहे. हा लाठीहल्ला करणार्या सरकारचा मी तीव्र निषेध करतो. या प्रकरणात सरकार व पोलिस प्रशासनाने लक्ष घालून संबंधितावर कारवाई करावी. या घटनेची सखोल चौकशी करावी. पुन्हा कदापीही अशी घटना घडू नये यासाठी शासनाने प्रयत्न करावेत असेही आ. अजित पवार म्हणाले.