

सातारा: पुढारी वृत्तसेवा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि. २३ जून या कालावधीत सातारा जिल्हयामधून मार्गक्रमण करणार आहे. हा सोहळा शांततेत व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांचे नियोजन करुन हा आषाढी वारी पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या.
सातारा जिल्हयातील निरा नदी ते साधुबुवाचा ओढा या पालखी मार्गाची, पालखी मार्गावरील विसावा, दुपारचे भोजन स्थळ, पालखी तळ याचा पाहणी दौरा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाचे संजय कदम आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जयवंशी म्हणाले की, पालखी सोहळ्यासाठी शुद्ध पिण्याचे पाणी, शौचालय, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, वीज, रस्ते, अग्निशमन पथक, आरोग्य सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी खंडाळा आणि फलटण तालुक्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. भाविकांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही, यासाठी सर्वच यंत्रणांनी दक्षता घ्यावी. पालखी स्वागताची तयारी चांगल्या प्रकारे करावी.
शुद्ध पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करण्यात यावे. त्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी. दवाखान्यांमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरणाने महामार्गावर असलेले अडथळे त्वरित काढावेत, तसेच सर्व यंत्रणांनी पालखी सोहळ्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप आणि वाईचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव यांनी
पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाविषयीची माहिती दिली.
हेही वाचा