कराड; पुढारी वृत्तसेवा : सुप्रीम कोर्टाने आज शिंदे गट पक्षावर दावा करू शकत नाही. तसेच भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती बेकायदेशीर असल्याचे मत नोंदविले आहे. ज्याअर्थी संवैधानिक पदावर असलेल्या राज्यपाल, विधिमंडळ अध्यक्षांवर ओढलेले ताशेरे, यावरून हे सरकार बेकायदा पद्धतीने अस्तित्त्वात आले आहे, असं स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून दिसतो. यामुळे सुप्रीम कोर्टाने ओढलेले ताशेरे गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने नैतिकतेच्या आधारावर तात्काळ राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उद्धव ठाकरेंनी राजीनामा देणं ही चूक होती. त्यांनी फ्लोअर टेस्टचा सामना करायला हवा होता, असे मत चव्हाण यांनी व्यक्त केले. ते म्हणाले की, कायदेशीर रित्या उद्धव ठाकरेनी राजीनामा देणं चूक असली तरी नैतिकता जपणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी राजीनामा दिला. ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे सरकार अस्तित्त्वात आलं, त्यानंतर जो घोडेबाजार झाला, हे पाहता सरकार बेकायदा, असंवैधानिक आहे. याकरता पुढची न्यायालयीन कारवाई निश्चितच केली जाईल. पण इतके गंभीर ताशेरे संवैधानिक पदावर बसलेल्या लोकांवर ओढले आहेत, ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयीन झगडे, कोर्ट कचेऱ्या यापासून वाचवण्याकरता नैतिकतेच्या आधारावर शिंदे-फडणवीस सरकारने त्वरीत राजीनामा दिला पाहिजे आणि नव्या सरकारचे महाराष्ट्रात गठन केले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा :