शरद पवार यांचा राजीनामा हे पूर्वनियोजित नाटक; भाजपच्या केंद्रीय मंत्र्याची टीका
सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्हा हा एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण आता नाही. राष्ट्रवादीचे नेते आपसात भांडणात गुंतले आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुका भाजप जिंकणार आहे. शरद पवार यांनी दिलेला राजीनामा हा पूर्वनियोजित रचलेले नाटक होते, अशी टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांनी शरद पवार यांच्या राजीनामा प्रकरणावरून केली.
यावेळी मंत्री अजयकुमार मिश्रा म्हणाले की, दिल्लीमध्ये सुरु असलेल्या मल्लांच्या आंदोलनात ब्रिजभूषण बाबत कायदेशीर कारवाई होईल. भाजपचे नेते दोषी आणि अपराधी कमी आहेत, दुसऱ्या पक्षात ती संख्या अधिक आहे. भ्रष्टाचारी असतील तर कारवाई होणारच, आम्ही कोणाला सोडणार नाही, असे मिश्रा यांनी सांगितले.
कर्नाटकात निवडणुका सुरू आहेत. मागील निवडणुकीत भाजपने 108 जागा जिंकल्या आहेत. 2019 च्या निवडणुकीत राज्यात पूर्ण बहुमत दिलं होत. मात्र काही लोकांनी खुर्चीच्या मोहापायी युती तोडली, त्यामुळे महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला आहे. एक वर्षांपूर्वी आम्ही पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं असून येणाऱ्या निवडणुकीत आम्ही पूर्ण बहुमत घेऊन निवडणूक जिंकणार असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम पाहून ते इतर देशांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहेत. पंतप्रधान मोदींना हटवण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले. पण विरोधकांकडे कोणताही अजंडे नाही. विरोधक एकत्र आले तर त्यांना जनता स्वीकारत नाही. जेवढे विरोधक एकत्र येतील तेवढं आम्ही मजबूत होत आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :