पाचगणी; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीच्या सुट्टीत गावी आलेले चाकरमानी पुन्हा आपापल्या शहरात परत जाऊ आहेत. त्यातच वीकेंडमुळे पुणे- बंगळूर महामार्गावर कराड, साताराजवळ वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत. ट्रॅफिक जाममुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. आनेवाडी टोल नाक्यावर वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या होत्या. महामार्गावर प्रचंड गर्दी होती. खड्ड्यात हरवलेल्या महामार्गावरून वाट शोधताना वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली.
वेळे परिसरात खंबाटकी बोगद्यातून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाऊस जास्त प्रमाणात झाल्याने या बोगद्यातून पाण्याचे पाट वाहू लागले आहेत. यामुळेच या बोगद्यातून जाताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागते. परिणामी महामार्गावर वाहनांची गर्दी वाढून ट्रॅफिक जामची समस्या निर्माण झाली होती.
खंबाटकी बोगद्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रविवारी वेळे येथील महामार्गावर दुपारपासूनच भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली. या रांगा जवळपास तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाढल्या होत्या. कासव गतीने बोगद्यातून वाहतूक होत होती. महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे परतीच्या मार्गावर असलेल्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. तर काही वाहने बंद पडू लागल्याने वाहतूक कोंडीत आणखीच भर पडत होती.
प्रत्येक सणासुदीला महामार्गावर ट्रॅफिक जामची समस्या उद्भवत असते. याचा थेट परिणाम येथील स्थानिकांवर होत असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वसलेल्या वेळे गावातील लहानथोर ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. परिणामी अपघात होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने रस्त्यांची आवश्यक ती डागडुजी करून वेळे परिसरातील महामार्ग तत्काळ दुरुस्त करण्यास प्राधान्य द्यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
हेही वाचलंत का ?