सातारा : आखाडा मारण्यासाठी पारंपरिक 10 डावांचाच वापर | पुढारी

सातारा : आखाडा मारण्यासाठी पारंपरिक 10 डावांचाच वापर

सातारा : विशाल गुजर
बदलत्या काळानुसार कुस्तीतील डाव-प्रतिडाव अनेकदा नव्याने चर्चेत येतात. रांगडी कुस्ती काळानुरूप बदलू लागली असली तरी पारंपरिक डाव हेच यशाचे गमक ठरत आहेत. कुस्ती जिंकण्यासाठी प्रत्येक मल्ल प्रयत्नांची पराकाष्ठा करत असला तरी असे 10 डाव आहेत जे त्याला जिंकण्यापर्यंत घेऊन जातात. खोबर्‍यावरील कुस्ती असूद्या, नाहीतर महाराष्ट्र केसरी कुस्ती असूद्या, पारंपरिक डावच आखाडा मारायला आजही उपयुक्‍त ठरत आहेत.

कुस्ती हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जाणारा खेळ असून आजही महाराष्ट्रामध्ये खूप आवडीने खेळला जातो. पूर्वीच्या काळी हा खेळ फक्‍त पुरुषच खेळायचे, पण आताच्या काळामध्ये हा खेळ महिलाही खेळतात आणि त्याच्यावर ‘दंगल’ हा चित्रपटसुद्धा चित्रीत केला आहे. पूर्वीच्या काळामध्ये कुस्ती या खेळाला ‘मल्ल युद्ध’ या नावाने संबोधले जायचे तसेच कुस्ती हा खेळ ‘कुश्ती’ या पार्शी शब्दापासून आला आहे. कुस्ती या खेळाचे मैदान चौरस किंवा गोल आकाराचे असते आणि ते लाल मातीचे किंवा त्यावर लाल रंगाचे मऊ मॅट असते. कुस्तीच्या मैदानाला आखाडा किंवा तालीम म्हणतात. कुस्ती हा खेळ भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांमध्येही लोकप्रिय आहे. या खेळांमध्ये डाव, चपळता, निर्णय क्षमता फार महत्त्वाची ठरते. या खेळातील डावांचे हजारो प्रकार आहेत. त्यामध्ये कलाजंग, ढाक, मोळी, निकाल, आतील व बाहेरील टांग, एकेरी पट, दुहेरी पट, गदालोट, एकचाक, धोबीपछाड इत्यादी प्रकारांचा समावेश असतो. पूर्वीच्या काळी एकेरी पट, दुहेरी पट, धोबीपछाड, एकलांगी, ढाक, मोळी, निकाल, बांगडी, साल्टो, टांग या डावांचा मोठ्या प्रमाणात विरोधी मल्लाला चितपट करण्यासाठी वापर केला जात होता. आजचे पैलवानही याच डावांचा वापर करत आहेत. मॅटवर होणार्‍या कुस्तीत एकेरी पट, दुहेरी पट, भारंदाज, साल्टो, कलाजंग हे डाव वापरून पुढील पैलवानाला चितपट करतात. तर मातीवर केरी पट, दुहेरी पट, निकाल, टांग, कलाजंग या डावांचा वापर केला जातो. गेल्या दहा वर्षांत ज्या पैलवानांनी महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे त्यांनी थंडर व साईड थ्रो, भारंदाज, धोबी या डावांचा वापर केला आहे. कुस्तीचे आलिम्पिक सामने एका जाड सतरंजीवर खेळले जातात. या खेळात फ्रीस्टाईल कुस्ती नावाचा एक उपप्रकार आहे.

‘महाराष्ट्र केसरी’त गुणांवरच अनेक लढतींचे निकाल

आतापर्यंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने 63 महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या आहेत. यात 56 वेळा लढती झाल्या असून 7 लढती झाल्या नाहीत. 2 वेळा मल्ल न आल्याने लढती रद्द झाल्या. 3 वेळच्या लढतीत अनिर्णीत तर 2 वर्षे कोरोनाने ही स्पर्धा रद्द झाली. त्यामुळे आजपर्यंत 56 वेळा ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा पैलवानांनी मारली आहे. मात्र, यात निम्म्या कुस्त्या या गुणांवर विजयी झाल्या आहेत.

Back to top button