महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ

महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ
महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ
Published on
Updated on

सातारा : पुढारी वृत्तसेवा
कोरोना प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून महागाईचा आलेख वाढला आहे. मागील आठवड्यापासून महागाईची वरकढीच झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंंबरोबर खाद्यतेलाच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. होलसेल दर व किरकोळ विक्री यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत अढळून येत आहे. त्यामुळे आधी गॅस दरवाढीने मेटाकुटीला आलेल्या गृहिणींचे या दरवाढीमुळे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आता पैसेच शिल्लक राहत नसल्याने त्यांचा त्रागाही वाढला असून आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ येत आहे. सर्वच गोष्टींमध्ये महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्यांचे जगणेच अवघड झाले आहे.

कष्टकर्‍यांचं जगणं अवघड

कोरोना प्रतिबंधक लसीकरणामुळे महामारीच्या सावटापासून आत्ता कुठे सर्वसामान्य नागरिक सावरू लागले असले तरी अद्याप असाही एक वर्ग आहे, जो अजूनही उदरनिर्वाहासाठी दररोज संघर्ष करतोय. त्यातच दोन वेळच्या भुकेसाठी महागाईचा चटका बसू लागल्याने अशा कष्टकरी वर्गाचे जगणे अवघड झाले आहे.

महागाईमुळे जेवण झालेय बेचव…

होलसेल दरामध्ये किरकोळ वाढ झालेली असताना किरकोळ विक्रीत मात्र भरमसाठ दरवाढ करण्यात आली आहे. तसेच प्रत्येेक दुकानामध्ये वेगवेगळे दर आकारले जात आहेत. सर्वसामान्यांच्या आहारामध्ये सूर्यफूल व सोयाबीन तेलाचा वापर केला जातो. तेल खरेदीसाठी ग्राहकांच्या खिशाला चांगलीच आर्थिक फोडणी बसत आहे. स्वयंपाकाच्या गॅसने हजारी गाठल्याने स्वयंपाकासाठी इंडक्शन, चूल, तसेच गॅस बचतीसाठी प्रेशर कुकर, सौर पेटीचा वापर होत आहे. या दररोजच्या जेवणाला महागाईची फोडणी बसू लागल्याने जेवन बेचव होवू लागले आहे.

जुनाच स्टॉक नवीन दरात…

आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कारण पुढे करून महागाईची बनवा बनवी सुरू आहे. प्रत्यक्षात मागील पाच ते सहा दिवसांत युक्रेन-रशिया युध्दाला सुरुवात झाली असली तरी होलसेलची गोडाऊन महिन्याचा स्टॉक भरत असतात. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आयात-निर्यातीचा परिणात लोकल मार्केटवर इतक्या कमी कालावधीत होणे शक्य नाही. परिस्थितीचे भांडवल करुन जुनाच स्टॉक वाढीव दरात विकण्याचे पाप स्थानिक व्यावसायिकांकडून केले जात आहे. उच्च वर्गीयांना त्याचे सोयरसुतक नसले तरी सर्वसामान्य मात्र भरडला जात आहे.

खाद्यतेलाचा डबा 2450 च्या पुढेच…

मागील काही महिने कोरोना, त्यानंतर इंधन दरवाढ आणि आता आंतरराष्ट्रीय घडामोडींचे कारण पुढे करुन दुकानदारांकडून ग्राहकांची अक्षरश: लूट सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने खाद्यतेलाचे डबे, डाळ, शेंगदाणा किराणा साहित्याच्या किमतीही 5 ते 10 टक्क्यांनी वाढल्या आहेत. डाळी महागल्या तर कंद व फळभाज्या, पालेभाज्यांचा पर्याय निवडू शकतो. परंतु खाद्यतेलाशिवाय स्वयंपाकच होऊ शकत नाही. खाद्यतेलाच्या किमतीमध्ये झालेल्या दरवाढीने फेब्रुवारी अखेरीस उच्चांक गाठला आहे. सूर्यफूल, सोयाबीन तेलाच्या 15 किलोच्या डब्यासाठी तब्बल 200 ते 250 रुपये जादा मोजावे लागत आहेत.

प्रत्येक दिवसाला वाढताहेत किमती

मागील दोन वर्षांपासून कोरोना प्रादुर्भाव सुरू आहे. महामारीबरोबरच काही महिन्यांपासून जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यातच मागील आठवड्यापासून दरदिवसाला जीवनावश्यक वस्तू व खाद्यतेलाच्या किमतीमध्ये दर वाढ होवू लागल्याने कष्टकरी वर्गाबरोबरच सर्वसामान्यांचे जगणे अवघड झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news