सातारा : वाहून गेलेला पूल कधी होणार? | पुढारी

सातारा : वाहून गेलेला पूल कधी होणार?

केळघर : पुढारी वृत्तसेवा : दि. 22 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीने प्रवाह बदलल्याने वाहून गेलेल्या नांदगणे-पुनवडी दरम्यानचा पूल होणार तरी कधी? असा सवाल या भागातील जनतेने उपस्थित केला आहे.

अतिवृष्टीवेळी वेण्णा नदीचे पात्र बदलल्याने हा पूल अर्धा तुटून वाहून गेला होता. मात्र, 6 महिने उलटून गेले तरी बांधकाम विभागाला हा पूल बांधण्यास मुहूर्त मिळाला नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या पुलावरून प्रवास करताना परिसरातील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. नांदगणे ते पुनवडी दरम्यानचा हा पूल वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा पूल असून या पुलावरून पुनवडी, केडंबे, वाळंजवाडी, तळोशी, बाहुळे, भुतेघर, बोंडारवाडी या गावातील ग्रामस्थ दररोज ये-जा करीत असतात.

केळघर व मेढ्याला येणार्‍या नागरिकांची या पुलावरून नेहमी वर्दळ असते. हा पूल उंच बांधावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी केली होती. मात्र, अजूनही गांभीर्याने बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. एखादा अपघात झाल्यावरच बांधकाम विभागास जाग येईल का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

हा पूल वाहून गेल्याने जवळपास सात ते आठ गावांचा केळघर व मेढ्याशी असणारा संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यानंतर दै. ‘पुढारी’त आवाज उठविल्यानंतरच नांदगणे बाजूला तुटलेल्या जागेवर तात्पुरता भराव टाकण्यात आला. परंतु, या अरुंद रस्त्यावरून अवजड वाहने व एस.टी. जात नसल्याने अडचणी येत आहेत. पावसाळ्यापूर्वी हा पूल झाला नाही तर पुन्हा एकदा सात ते आठ गावांतील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी यांना अडचणींचा सामना करावा लागेल.

हेही वाचलत का?

राजर्षी छ. शाहू महाराज आणि एका शेणीवालीची गोष्ट

Back to top button