जत; पुढारी वृत्तसेवा : जत तालुक्यात अनेक गावात घोणस अळीचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्यांच्या मनात घोणस अळी विषयी भीती कायम आहे. उंटवाडी (ता.जत) येथील विनायक लक्ष्मण सुतार (वय २७) या युवकाच्या हाताला घोणस अळीने दंश केले. त्यामुळे त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
तालुक्यात घोणस अळीने येळवी, खैराव, टोणेवाडी या गावातील शेतकऱ्यांना दंश केला होता. त्यांच्यावर येळवीतील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर ते बरे झाले. घोणस अळीने सांगली जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून शेतकरी लोकरी मावा आणि हुमणी अशा संकटातून मार्गक्रमण करीत असताना आता शेतकऱ्यांसमोर घोणस नावाच्या अळीचे नवे संकट उभे केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.
उंटवाडी येथील तरुण आपल्या कुटुंबासह गुरुवारी शेतात भुईमुगाच्या शेंगा काढत होता. अचानक त्याच्या हाताच्या बोटाला दंश झाला. त्यामुळे त्याला वेदना झाल्या. त्याने अळीचे निरीक्षण केले आणि घोणस अळी असल्याचे स्पष्ट झाले. युवकाला वेदना असह्य होऊ लागल्याने त्याला तातडीने जत येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा;