विटा : पुढारी वृत्तसेवा : मंत्रिपदाच्या आशेने एकनाथ शिंदेंच्या मागे पळून गेलाय, हे मान्य करा उगाच महाविकास आघाडी शासन आणि टेंभूला बदनाम करु नका, अशी टीका विट्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आमदार अनिलराव बाबर यांच्यावर (Vaibhav Patil v/s Anil Babar) केली.
(Vaibhav Patil v/s Anil Babar) मंत्रिपदाची नव्हे, तर टेंभू योजना पूर्ण करण्यासाठी आपण एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहोत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आणि खानापूर आटपाडीचे आमदार अनिलराव बाबर यांनी दिली होती. त्यावर राष्ट्रवादी कडून वैभव पाटील यांनी टेंभूच्या नावावर लोकांना बनवू नका, आमदार स्वार्थासाठी कार्यकर्त्यांशी गद्दारी करून पळून गेले आहेत, अशी टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आमदार बाबर यांचे चिरंजीव आणि शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी वैभव पाटील यांच्यावर भाजपशी सलगी करणाऱ्यांनी आमची मापे काढू नयेत, असे सुनावले होते. त्याला प्रत्युत्तर देताना पुन्हा वैभव पाटील यांनी आमदार बाबर यांना लक्ष केले आहे.
भव पाटील म्हणाले की, स्वतः स्वार्थासाठी पक्षांतराला टेंभूचे नाव देऊन जनतेची फसवणूक आणि स्वतःचे उद्दातीकरण करुन घेण्यास जनतेचा विरोध आणि आक्षेप आहे. पक्षनेतृत्वाला सांगून गेला होतात, पहिल्या १२ अपात्रांच्या यादीत तुमचा नंबर कसा? हे विश्वासघाताचे नाही तर कशाचे लक्षण आहे. तुम्ही विश्वासघाताचे ब्रँड ॲम्बेसिडर झाला आहात, याचा इतिहास साक्षीदार आहे. १९७२ पासून कै. संपतरावनाना माने, कै. शहाजीबापू पाटील, कै. शिवाजीराव देशमुख, तालुक्यातील तत्कालीन अनेक नेते मंडळी यांच्यासह माजी आमदार, विद्यमान खासदार या सर्वांचा वापर करुन त्यांना फसवून तुम्ही राजकारण केले. या इतिहासाची साक्षीदार खानापूरची जनता आहे.
तुम्ही किती आणि कशी पक्षांतर करावी, हा तुमचा प्रश्न आहे. पण गेल्या अडीच वर्षात आघाडी शासनाने टेंभूसाठी तब्बल ८८० कोटी रुपये निधी दिला आहे. असे असताना शासनाच्या नावाने का बोटं मोडताय ? आताच्या पक्षांतराबाबत समस्त जनता खुश आहे, असं म्हणताय तर समाजमाध्यमातून आणि आम्हास समक्ष भेटलेल्या लोकांकडून तिखट प्रतिक्रिया का व्यक्त होतायत ? याचा लोकांत येऊन अंदाज घ्या. तुम्हालाही धक्का बसेल, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचलंत का ?