

सांगली: पुढारी वृत्तसेवा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप न घेतल्याने शेतकऱ्यामध्ये असंतोष पसरला आहे. त्यातूनच सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबेदिग्रज येथील रविवारी (दि.२७) रोजी रात्री महावितरणचे कार्यालय पेटविले. या आंदोलनाची तीव्रता वाढत असून शासनाने तत्काळ दखल घ्यावी अन्यथा उद्रेक घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
गेल्या सात दिवसांपासून माजी खासदार राजू शेट्टी हे कोल्हापूर येथील महावितरण कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनास बसले आहेत. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी त्यांचे आंदोलन सुरू आहे. मात्र, शासनाने या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. (महावितरणचे कार्यालय पेटविले )
याचं प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता. मात्र, तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच शेतकऱ्यामध्ये संताप निर्माण झाला आहे. त्यामुळेच रविवारी रात्री उशिराने सांगली इस्लामपूर रस्त्यावरील कसबेदिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटविण्यात आले. कार्यालयातील कागदपत्रे व अन्य साहित्य जाळून खाक झाले आहे. अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून सोमवारी पहाटे आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे.
हेही वाचलंत का?