![कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F05%2FUntitled-design-T-.-1-297.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
तासगाव : पुढारी वृत्तसेवा; तासगाव-मणेराजुरी रस्त्यावर एका मंगल कार्यालयाजवळ असणाऱ्या ताकारी कालव्यात अल्टो कार कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटूबातील सहाजण जागेवरच ठार झाले. सुदैवाने एक महिला बचावली. हा अपघात (बुधवार) रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
अपघातात राजेंद्र जगन्नाथ पाटील (वय ६०), सुजाता राजेंद्र पाटील ( दोघे रा, तासगाव वय ५५ ), प्रियंका अवधूत खराडे (वय ३०), द्रुवा अवधूत खराडे (वय ५), कार्तिकी अवधूत खराडे ( तिघे रा, बुधागाव वय १ वर्ष), राजवी विकास भोसले (वय तीन महिने रा, कोकळे ता, कवठेमहांकाळ) असे सहाजण जागेवरच ठार झाले तर स्वप्नाली विकास भोसले (रा, कोकळे ता, वय २६) या सुदैवाने बचावल्या आहेत. मात्र त्या जखमी झाल्या आहेत.
मृत कुटूंब हे बचावलेल्या स्वप्नाली भोसले याचा मंगळवारी वाढदिवस होता. त्यासाठी सर्व कुटूंब वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वप्नाली यांच्या सासरी कोकळे येथे एकत्र आले होते. मंगळवारी रात्री वाढदिवस साजरा करून, जेवण करून तासगाव येथे येण्यासाठी रात्री उशिराने अल्टो कार (एम एच १० ए एन १४९७) मधून येत होते. कार मृत राजेंद्र हे चालवत असताना कार मणेराजुरी रस्त्यावरील ताकरी कालव्याजवळ आली असता राजेंद्र यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार कालव्यात कोसळली.
अपघात रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडला असल्याने बचावलेल्या स्वप्नाली यांनी मदतीसाठी आरडा ओरडा केला, मात्र कोणाला येता आले नाही. त्यामुळे जखमींना वेळेत उपचार न मिळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सहा वाजता मॉर्निग वॉकसाठी गेलेल्याना कालव्यातून महिलेचा आवाज येत असल्याने ही दुर्दुवी घटना घडल्याचे समजले. त्यांनी महिलेला कालव्यातून बाहेर काढले व घटनेची माहिती पोलिसांना कळविली, पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सर्व मृतदेह कालव्यातून बाहेर काढले.
हेही वाचा ;