नागज; पुढारी वृत्तसेवा : संपूर्ण देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नागज (ता. कवठेमहांकाळ) येथील भटकंती करत येऊन राहिलेल्या पालावरही तिरंगा फडकला आहे.
"शासनाच्या घर घर तिरंगा" या योजनेअंतर्गत घराघरावर तिरंगा फडकताना दिसत आहे. नागज येथील गरिबांच्या झोपडीवर तिरंगा लावला नसल्याचे प्रा. संजयकुमार घेरडे यांच्या लक्षात आले. त्यांनी स्वखर्चातून झेंडे उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याचे कौतुक केले जात आहे. तिरंगा झेंडा लावल्यावर त्या पालातील कुटूंबियांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर दिसत होती.
संजयकुमार घेरडे म्हणाले, नागज येथील गरिबांच्या झोपडीवर तिरंगा लावला नसल्याचे दिसून आले. त्यानंतर सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून तिरंगा व काठ्या देऊन त्यांच्या झोपडीवर तिरंगा लावण्यास मदत केली. तिरंगा लावल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद मनाला समाधान देणारा ठरला. १५ ऑगस्टला झोपडीतील प्रत्येकाला जिलेबी वाटप करणार असल्याचे त्यांनी सांगितले.