पाणी साचणार्या भागात बांधकाम परवाने दिले कसे?
सांगली : जागतिक बँकेच्या पथकाने बुधवारी शामरावनगर परिसराला भेट दिली. पाणी साचून राहणार्या भागात बांधकाम परवाने दिले कसे, असा प्रश्न उपस्थित केला. मोठ्या इमारती, अपार्टमेंटस्ना पाईल्स फाऊंडेशन आहे की राफ्ट फाऊंडेशन, असा प्रश्न केला. पाणी साचून राहणार्या भागातील मोठ्या इमारती, अपार्टमेंटस् दरवर्षी दोन-दोन मिलीमीटरने खचतील, अशी भीतीही व्यक्त केली.
जागतिक बँकेचे वरिष्ठ आपत्ती जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ अनुप कारंथ, वरिष्ठ सामाजिक विकास विशेषज्ञ वरूण सिंग, वरिष्ठ पर्यावरण विशेषज्ञ नेहा व्यास, वरिष्ठ वित्तीय व्यवस्थापन विशेषज्ञ सविनय ग्रोव्हर यांच्या पथकाने बुधवारी महापालिका क्षेत्रातील शामरावनगर परिसरातील महापूर बाधित तसेच पावसाचे पाणी साचून राहिलेल्या भागाला भेट दिली.
खिलारेनगर, रुक्मिणीनगर, उषःकाल हॉस्पिटल पश्चिम भाग, एपीजे अब्दुल कलाम हायस्कूल रोड परिसर, सिद्धीविनायक कॉलनी, भंगार बाजारचा पाठीमागील भाग तसेच कृष्णा नदीवरील बंधारा, आर्यविन पूल, स्टेशन चौक येथे पाहणी केली. त्यांच्यासमवेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, पाणीपुरवठा विभागाचे विशेष कार्यअधिकारी सुनील पाटील, ड्रेनेज विभागाचे अभियंते तेजस शहा, आरोग्याधिकारी (स्वच्छता) डॉ. रवींद्र ताटे, उपअभियंता महेश मदने होते.
खिलारेनगर येथे पाहणी सुरू असताना कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सदस्य सुयोग हावळ यांनी शामरावनगरमधील साचून राहणार्या पाण्याची समस्या मांडली. सिद्धीविनायक कॉलनीत 2019 रोजी महापुराचे आलेले पाणी पाच वर्षे झाले तरी साचून राहिले असल्याकडे लक्ष वेधले. कृष्णा महापूर नियंत्रण समितीचे सर्जेराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते संदीप दळवी उपस्थित होते.
निधी देऊ, पण...!
प्रशासनाने कसाही कारभार करायचा आणि जागतिक बँकेने पैसे द्यायचे, असे कसे चालेल. जागतिक बँक निधी देईल, पण निधीचा वापर योग्य होणार आहे का, हे पहावे लागेल. पैशाचा योग्य विनियोग महत्वाचा आहे. स्टॉर्म वॉटर मॅनेजमेंटचा आराखडा, त्यातील उपाययोजना गांभिर्याने पाहू, असे जागतिक बँकेच्या पथकाने महापालिकेच्या अधिकार्यांना सांगितले.
नैसर्गिक नाले महत्वाचे
विकास कामे ही कधीही नैसर्गिक संरचनांना तडा जाऊ देणारी नसली पाहिजेत, असा मुद्दा जागतिक बँकेच्या तत्ज्ञांनी मांडला. साचणारे पाणी वाहून जाण्यासाठी बांधीव गटारीपेक्षाही नैसर्गिक नाले महत्वाचे आहेत. त्यांचा प्रभावी वापर करा, असे मतही जागतिक बँक पथकातील अधिकार्यांनी व्यक्त केले.
प्रश्नांची सरबत्ती.. अधिकारी निरुत्तर !
शामरावनगरसारखी विकसित होत असलेली उपनगरे पाहता येथील भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास केला नाही का? नैसर्गिक नाले आहेत का? काळी जमीन आणि पाण्याचा निचरा होत नाही, अशा भागात नागरी वस्तीला किंवा आता होत असलेल्या उंच उंच अपार्टमेंटस्ला बांधकाम परवाने कसे काय दिले? पाईल्स फाऊंडेशन आहे की राफ्ट फाऊंडेशन? त्यांची बिल्डिंग लाईफ किती राहील यासारख्या प्रश्नांची सरबत्ती केली. अहमदाबाद येथील निरीक्षणातून असे दिसून आले की तेथील इमारती दरवर्षी 2 मिलीमीटरने जमिनीत खचत आहेत. इथली जमीन, साचून राहणारे पाणी पाहता, इथेही इमारती दरवर्षी दोन मिलीमीटरने खचतील, अशी भीतीही पथकातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.