Accident : तिप्पेहळळी येथे बोलेरोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी | पुढारी

Accident : तिप्पेहळळी येथे बोलेरोची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू तर एक जखमी

जत : पुढारी वृत्तसेवा : विजापूर -गुहागर राष्ट्रीय महामार्गवरील तिप्पेहळळी नजीक झालेल्या दुचाकी व बोलेरोच्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सचिन विठ्ठल बिराजदार (वय २३, सोनलगी) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (दि.१३ ) रोजी सकाळी पावणेदहाच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. दरम्यान दुचाकीवरील सत्याव्वा म्हाळाप्पा हाक्के या किरकोळ जखमी झाल्या आहेत. सदरची घटनेची जत पोलिसात नोंद आहे. या घटनेने उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Accident )

संबंधित बातम्या 

याबाबत अधिक माहिती अशी, सोनलगी येथील तरुण सचिन बिराजदार हा कामानिमित्त सांगली येथे बोलेरो या वाहनाने जात होता. दरम्यान तिप्पेहळळी नजीक एका अपघाती वळणावर समोरून आलेली दुचाकी न दिसल्याने या ठिकाणी अपघात झाला. तसेच दुचाकीवरून जात असलेल्या पती-पत्नी ही गाडीवरून खाली पडले. यात म्हाळाप्पा हक्के यांची पत्नी सत्याव्वा या किरकोळ जखमी झाल्या आहेत. बोलेरो गाडी महामार्गाच्या बाजूच्या खड्ड्यात कोसळली. या गाडीने तब्बल पाच ते सहा वेळा पलटी झाली. भीषण अपघातात गाडी चक्काचूर झाला आणि गाडीतील युवक सचिन बिराजदार हा गंभीररित्या जखमी झाला.

दरम्यान जत येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश गिड्डे यांना ही घटना समजताच घटनास्थळी धाव घेत जखमीना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. याचवेळी जत येथे जखमी बिराजदार यास आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या गाडीमधून खाजगी हॉस्पिटला नेण्यात आले. परंतु, गंभीर जखमी असल्याने त्याला सांगली येथे नेण्यास डॉक्टरांनी सांगितले होते. मात्र, रस्त्यातच बिराजदार यांचा मृत्यू झाला आहे.

उमदी परिसरात हळहळ

सचिन बिराजदार यांचे उमदी येथे कृषी दुकान होते. त्यामुळे जनसंपर्क चांगला होता. तसाच तो मनमिळावू शांत स्वभावाचा होता. या अपघातानंतर उमदी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ( Accident )

आमदार विक्रमसिंह धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

या भीषण अपघाताच्या दरम्यान आमदार विक्रमसिंह सावंत पलूस -कडेगाव येथे येथील एका कार्यक्रमासाठी जात होते. परंतु, अपघात पाहताच त्या ठिकाणी थांबून त्यांनी अपघातग्रस्त जखमी सचिन बिराजदार यास आपल्या गाडीने जत येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले.

राष्ट्रीय महामार्ग बनला अपघाती मार्ग : धोकादायक वळणाने घेतले तब्बल २२ जणांचे बळी

विजापूर राष्ट्रीय महामार्ग हा विकासाचा राज्यमार्ग न बनता अपघाताचा मार्ग बनला आहे. गेल्या दीड वर्षात तब्बल जत ते कुंभारी दरम्यान २२ जण ठार झाले आहे. ते केवळ धोकादायक वळणामुळे. याच ठिकाणी गतवर्षी तिघेजण जाग्यावरच ठार झाले होते. त्याचबरोबर बिरनाळ येथील धोकादायक वळणावर एकाच वेळी चार युवक ठार झाल्याच्या घटना घडली आहे. या धोकादायक वळणावर उपाययोजना करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Back to top button