थकीत ऊस बिले ३० नोव्हेंबरपर्यंत द्या अन्यथा कारवाई करू… | पुढारी

थकीत ऊस बिले ३० नोव्हेंबरपर्यंत द्या अन्यथा कारवाई करू...

विटा; पुढारी वृत्तसेवा :

विटा येथील खानापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ३० नोव्हेंबरपर्यंत द्या, अन्यथा कायदेशीर कारवाई करू असा सज्जड इशारा तहसीलदार ऋषिकेत शेळके यांनी यशवंत शुगरला दिला आहे. थकीत ऊस बिले मिळण्याबाबत आज शेतकरी संतप्त झाले हाेते.

यशवंत शुगर साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलांच्याबाबत आज सोमवारी येथील तहसील कार्यालयात बैठक झाली.

तहसीलदार ऋषिकेश शेळके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला यशवंत शुगरचे शेतकी अधिकारी संजय मोहिते, शेतकरी सेनेचे भक्तराज ठिगळे, राजू जगताप, नामदेव जाधव यांच्यासह तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सन २०२०-२०२१ या हंगामा साठी नागेवाडी (ता.खानापूर) च्या यशवंत शुगर साखर कारखान्याला अनेक शेतक-यांनी ऊस घातला होता. या ऊसाच्या बिलाची रक्कम अद्याप संबंधित शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

त्यामुळे शेतकरी सेनेने भक्तराज ठिगळे यांच्या नेतृत्वाखाली ४ नोव्हेंबर रोजी काळी दिवाळी साजरी करत विटा तहसिल कार्यालयासमोर खर्डा- भाकरी आंदोलन केले हाेते.

यापूर्वीही शेतकरी सेनेने दोन वेळा आंदोलन केले होते. त्यावर तहसीलदारांनी पत्र पाठवून यशवंत शुगर कारखान्याला नियमानुसार तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

परंतु यावर आजअखेर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही. याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.

या बैठकीच्या सुरवातीला तहसीलदार शेळके यांनी कारखान्याच्यावतीने कार्यकारी संचालक का उपस्थित नाहीत ? असे विचारले असता शेतकी अधिकारी मोहिते यांनी ते जिल्हा बँकेच्या कामात असल्याची माहिती दिली.

त्यावर शेळके यांनी, थेट दूरध्वनी करून कार्यकारी संचालक आर. डी. पाटील यांच्याशी चर्चा केली.

मात्र शेतकरी सेनेच्या भक्तराज ठिगळे यांनी, हे लोक शेतकऱ्यांना फसवत असून, जिल्हा बँक सुद्धा यामध्ये ना सामील असल्याचा आरोप केला.

यापुर्वी २३ ऑक्टोबर रोजी मोर्चा काढला असता, ३० ऑक्टोबरपर्यंत पैसे दिले जातील असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच २४ ऑक्टोबरला चेक भरले आणि २८ ऑक्टोबर ला ते परत घेतलेत या आरोपाचा पुनरुच्चार केला.

त्यावर तहसीलदार शेळके यांनी जिल्ह्यात कुठेही झालेले नसेल एवढी सक्त भूमिका आपण घेतली आहे.

पैसे न देणाऱ्या कारखान्यांची साखर आपण सील केली आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या बरोबर आहे असे सांगत यशवंत कारखान्याने गाववार खातेदार आणि रक्कम याची यादी द्या.

तसेच शेतकऱ्यांचे पैसे कधी दिले जाणार याची माहिती द्या असे सांगितले.

त्यावर कारखाना प्रशासनाने, यादी सादर करत, गेल्या हंगामाचे आता पर्यंत ५५ लाख रुपये अदा केले आहेत. तसेच उर्वरीत ५१ लाख रुपये लवकरच देऊ असे सांगितले.

शेतकऱ्यांना बँकेच्या जप्तीच्या नोटिसा आलेल्या आहेत. लवकर पैसे मिळाले नाहीत तर सर्वांचे जगणे अवघड होईल.

त्यामुळे कारखान्याने वेळेत पैसे द्यायला हवेत अशी मागणी करण्यात आली.

बैठकीच्या शेवटी तहसीलदार शेळके यांनी, नागेवाडी गार्डी आणि साळशिंगे या गावांतील शेतकऱ्यांचे पैसे २५ नोव्हेंबर आणि संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांचे पैसे ३० पर्यंत अदा करण्यात यावेत अशा सूचना केल्या.

त्याचबरोबर ही अंतिम मुदत असल्याचे ही सांगत ३० नोव्हेंबर नंतर कोणतीही सबब ऐकून न घेता कायदेशीर कारवाई करू असा सक्त इशारा यशवंत शुगर कारखान्याला दिला आहे.

हे ही वाचा :

Back to top button