सांगली: ग्रामपंचायतींसाठी ७५. ६२ टक्के चुरशीने मतदान, चिंचणी येथे मोहनराव कदम यांचे मतदान

सांगली: ग्रामपंचायतींसाठी ७५. ६२ टक्के चुरशीने मतदान, चिंचणी येथे मोहनराव कदम यांचे मतदान

कडेगाव: पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (दि. 5) अत्यंत शांततेत व चुरशीने मतदान झाले. चिंचणी, शाळगाव आणि उपाळे मायणी या तीन ग्रामपंचायतीसाठी एकूण 75.62 टक्के मतदान झाले. तर तडसर पोटनिवडणुकीसाठी 60.21 टक्के आणि मोहिते वडगाव पोट निवडणुकीत 63.51 टक्के मतदान शांततेत पार पडले.

रविवारी सकाळी 7.30 वा सर्वत्र उत्साहात व शांतते मतदानाला सुरुवात झाली. तर मतदानाला सकाळपासूनच मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. सकाळी मतदान अत्यंत संथ गतीने झाले. त्यानंतर मतदानाला वेग प्राप्त झाला. 11.30 वा पर्यंत 24.83 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी 1.30 वा पर्यंत 39.37 टक्के मतदान झाले. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता पर्यत 57.55 टक्के मतदान झाले. तर सायंकाळी दिवसाखेर 3 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 75.62 टक्के चुरशीने मतदान झाले.

कडेगाव तालुक्यातील चिंचणी, शाळगाव, उपाळे (मायणी), या तीन ग्रामपंचायतीत काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी अशी तिरंगी लढत होत आहे. माजी आमदार मोहनराव कदम यांच्या चिंचणी गावात सरपंचपदासाठी चौरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या 13 जागांसाठी 36 उमेदवार, शाळगाव येथे सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. तर सदस्यपदासाठी 11 जागांसाठी 30 उमेदवार आणि उपाळे (मायणी) येथेही सरपंचपदासाठी तिरंगी लढत होत आहे. सदस्य पदाच्या 9 जागांसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

दरम्यान, तालुक्यात होत असलेल्या 3 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 75.62 टक्के मतदान झाले. एकूण 12156 मतदार आहेत. यामध्ये 6016 महिला तर 6140 पुरुष मतदार आहेत. त्यापैकी 9192 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 4424 महिला, तर 4768 पुरुष मतदारांचा समावेश आहे. दरम्यान मतदान करुन घेण्यासाठी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चुरस निर्माण झाली होती. तर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसीलदार अजित शेलार यांनी मतदान केंद्रांना भेटी देवून सूचना दिल्या. तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या नेतमंडळींनी मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

चिंचणीत दिग्गजानी बजावला मतदानाचा हक्क

चिंचणी गावात माजी आमदार मोहनराव कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे अध्यक्ष शांताराम कदम, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या वैशालीताई कदम, युवा नेते दिग्विजय कदम व हर्षवर्धन कदम यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news