सांगली : 'जिल्हाधिकाऱ्यांची तात्काळ बदली करा अन्यथा लोकप्रतिनिधींच्या दारात आंदोलन'
सांगली; पुढारी वृत्तसेवा : बेडग येथील मराठा उपोषणकर्त्यांचा अपमान करणारे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांची तात्काळ बदली करावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा तर्फे सर्व लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा मराठा समाजातर्फे देण्यात आलेला आहे. दरम्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका जवळ सुरू असलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
संबंधित बातम्या
- Pune News : पालकांच्या रेट्यापुढे प्रशासन नमले!
- दिवाळी २०२३ : मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास आणि परंपरा | Diwali Muhurat Trading History
- Pune News : बाप रे! चारशेपेक्षा जास्त झाडांची कत्तल
मारुती चौक येथील आंदोलनाच्या ठिकाणी झालेल्या बैठकीत बेमुदत उपोषणास अजित जगताप बसले होते. त्यांचे उपोषण सरबत देऊन पाठिंबा द्यायला आलेल्या केमिस्ट असोसिएशनच्या संचालकांच्या यांच्या हस्ते सोडवण्यात आले. मनोज जरांगे पाटलांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याला पाठिंबा दर्शवत साखळी उपोषण, सरकारचा अंत्यविधी, सार्वजनिक माती लोटण्याचा, सामूहिक मुंडन आणि उत्तरकार्यविधीचा आंदोलनाचा जो टप्पा होता तो स्थगित करण्यात आलेला आहे.
आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा होणारा निर्णय, त्यापुढे मराठा नेते व आंदोलनाचे प्रमुख मनोज जरंगे पाटील हे जी भूमिका घेतील त्यावर पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात निर्णय घेण्यात आला. गाव-गाड्यात प्रत्येक ग्रामीण भागातल्या मराठा बांधवांनी ज्या- ज्या ठिकाणी जे आंदोलन सुरू केलेले आहे. ती संघर्षाची ज्योत कायम तेवत राहण्यासाठी, समाजात एकमत राहण्यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवर चर्चा करून त्याची दिशा ठरवावी असेही या बैठकीत ठरविण्यात आले आहे.
डॉ. संजय पाटील, विलास देसाई, शंभूराज काटकर, सतीश साकळकर, श्रीकांत शिंदे, नितीन चौगुले, कॉम्रेड उमेश देशमुख, संतोष माने, नितीन चव्हाण, विश्वजीत पाटील, तानाजी भोसले, अक्षय मिसाळ, अमोल चव्हाण, रोहित पाटील, गजानन साळुंखे, संभाजीराव पोळ, संभाजीराव पाटील आदी उपस्थित होते.
सह्यांची मोहीम
सांगली शहरात सह्यांची मोहीम आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन चालू राहण्यासाठी दिवाळीनंतर सांगलीत प्रमुख भागांमध्ये प्रत्येक रविवारी त्या- त्या भागातील मराठा एकत्र करून सह्यांची मोहीम राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय धरणे, निदर्शने करण्याचा निर्णय जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आला.