विटा : पुढारी वृत्तसेवा बहिणीच्या लग्नासाठी मदुराईहून लेंगरेकडे (ता. खानापूर) येत असताना कार व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गलाई व्यावसायिकाचा मृत्यू झाला. अक्षय उत्तम शिंदे-पाटील (वय 21, रा. लेंगरे, ता. खानापूर, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे. ही घटना पुणे-बेंगळूर महामार्गावर कर्नाटक राज्यातील चित्रदुर्गजवळील हरियूर गावानजिक घडली. या अपघातात अन्य दोनजण जखमी झाले.
लेंगरे येथील उत्तम शिंदे यांचा मदुराई येथे गलाई आणि सराफीचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा अक्षय हा व्यवसाय सांभाळत होता. उत्तम शिंदे यांच्या मुलीचा विवाह पुढच्या आठवड्यात आहे. त्यासाठी अक्षय बहिणीच्या लग्नासाठी मदुराई येथून मंगळवारी (दि.3) सायंकाळी कार (टी. एन. 59, बी.एच. 5810) लेंगरेकडे येत होता. त्यावेळी त्याच्या सोबत गावातीलच गलाई व्यावसायिक धनाजी शिंदे-पाटील हे देखील होते.
बुधवारी (दि.4) सकाळी हरियूरनजिक कार पुढे घेत असतानाच समोरील ट्रकवर (टी.एन. 52, एल. 849) वर जावून धडकली. हा अपघात इतका भीषण होता की अक्षय याच्या कारचा चक्काचूर झाला. जखमी अक्षय आणि धनाजी शिंदे, त्यांच्या पत्नी छाया यांना चित्रदुर्ग येथील रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नेत असतानाच अक्षयचा मृत्यू झाला. धनाजी शिंदे यांच्यावर गुरुवारी सकाळी शस्त्रक्रिया करण्यात आली.अपघाताची माहिती लेंगरेत मिळाल्यानंतर गावातील लोकांनी तातडीने चित्रदुर्ग, बंगळुरू येथील काही गलाई व्यावसायिकांशी संपर्क साधला. त्यानंतर गलाई व्यावसायिक घटनास्थळी दाखल झाले. गावातूनही काहीजण रवाना झाले. बुधवारी रात्री अक्षयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.