इस्लामपूर, पुढारी वृत्तसेवा : जयंतराव, राजकीय संघर्ष राजकारणापुरताच मर्यादित ठेवा. तो संस्थात्मक पातळीवर आणू नका. अन्यथा तुम्हाला ज्या भाषेत समजेल, त्या भाषेत उत्तर दिले जाईल. मी संघर्षाला घाबरत नाही, असा इशारा माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांना पत्रकार बैठकीत दिला.
कुटील राजकारण करत मंत्रीपदाचा गैरवापर करुन आमच्या संस्था बंद पाडण्याचा प्रयत्न कराल, तर आम्हालाही तुमच्या संस्थेत लक्ष घालावे लागेल. तुमच्या संस्थांच्या गैरव्यवहाराच्या फाईली आमच्याकडे आहेत. अफगाणिस्तानला पाठवलेली साखर शत्रूराष्ट्र पाकिस्तानात कशी पोहोचली? त्याचे पैसे दुबईत कोणी घेतले, हे सर्व योग्यवेळ येताच जाहीर करु, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
निशिकांत पाटील म्हणाले, जयंत पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांनी पालकत्वाची जबाबदारी पार पाडत सर्वांना बरोबर घेवून जायला हवे. मात्र, त्यांनी जिल्ह्यात आपला विरोधकच तयार होवू नये म्हणून त्या़ंच्या संस्था अडचणीत आणून विरोधकच संपविण्याचे कुचके राजकारण सुरू केले आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश देवून प्रकाश हॉस्पिटलवर खोटे गुन्हे दाखल करायला सांगितले आहे. यासाठी पोलिसांवरही दबाव आणला जात आहे. हे सर्व कुटील राजकारण त्यांनी थांबविले नाहीतर यापुढे त्यांनाही त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. संघर्ष मला नवा नाही. जयंत पाटील यांच्याशी आता टोकाचाच संघर्ष राहिल, असेही पाटील यांनी सांगितले.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : महाराष्ट्र संतप्त आहे, व्यक्त होण्याची संधी कोल्हापूरकरांना मिळालीय : केशव उपाध्ये|Kolhapur Election